पुढारी ऑनलाईन डेस्क : दिल्लीतील लाल किल्ल्यावर आज स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित सोहळ्याला काँग्रेसचे अध्यक्ष ( Congress chief ) मल्लिकार्जुन खर्गे अनुपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केले. यावेळी काँग्रेस अध्यक्षांसाठी ठेवलेली राखीव खुर्ची रिकामी दिसली. याबाबत पक्षाने कारण सांगितले आहे.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आज लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणाला उपस्थित राहिले नाहीत. याबाबत काँग्रेस पक्षाने खुलासा केला आहे की, "सुरक्षेच्या कारणास्तव" खर्गे लाल किल्ल्यावरील कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच खर्गे लाल किल्ल्यावरील कार्यक्रमाला हजर राहिले असते, तर त्यांनी त्यांच्या निवासस्थानी आणि पक्षाच्या मुख्यालयातील ध्वजारोहण समारंभाला उपस्थित राहता आले नसते. तसेच त्यांना कार्यक्रमस्थळी पोहोचायला दोन तास लागणार होते, असेही पक्षाच्या पदाधिकार्यांनी सांगितले.
याबाबत बोलताना खर्गे म्हणाले की, माझ्या डोळ्यांशी संबंधित त्रास होत होता. त्यामुळे लालकिल्यावरील कार्यक्रमाला उपस्थित राहता आले नाही. तसेच सुरक्षा इतकी कडेकोट होती की पंतप्रधान निघण्यापूर्वी ते इतर कोणालाही जाऊ देत नाहीत. मला वाटले की मी येथे वेळेवर पोहोचू शकणार नाही. पंतप्रधान मोदी निघण्यापूर्वी इतर कोणालाही सोडण्यात आले नाही. प्रोटोकॉलनुसार सकाळी ९.२० वाजता माझ्या निवासस्थानी तिरंगा फडकावायचा होता. त्यानंतर, मला काँग्रेस कार्यालयातील कार्यक्रमास उपस्थित राहायचे होते. त्यामुळे वेळेअभावी आपल्याला लाल किल्ल्यावरील सोहळ्यास उपस्थित राहता आले नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
पंतप्रधानांच्या लाल किल्ल्यावरील भाषणाला खर्गे उपस्थित नव्हते यावर भाजपने नाराजी व्यक्त केली आहे. मात्र मार्गाच्या व्यवस्थेमुळे खर्गे यांना ध्वजारोहणाच्या कार्यक्रमासाठी पक्ष मुख्यालयात वेळेवर पोहोचणे अशक्य झाले असते याची पंतप्रधानांना जाणीव आहे का? स्वातंत्र्यदिनी आपल्या मुख्यालयात ध्वज फडकवण्याचे स्वातंत्र्य नाही का?, असा सवाल काँग्रेसचे नेते पवन खेरा यांनी केला.
हेही वाचा :