नागपूर जिल्हा परिषदेच्या ( Nagpur ZP ) १६ जागांसाठी झालेल्या पोट निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप आघाडीने बाजी मारली. १६ पैकी १३ जागा काँग्रेस-राष्ट्रवादी-शेकाप आघाडीने पटकाविल्या. तर भारतीय जनता पक्षाला ३ जागांवर समाधान मानावे लागले आहे. बुधवारी लागलेल्या निकालात काँग्रेसने ९, राष्ट्रवादीने २, शेकाप १, गोंडवाना गणतंत्र पार्टी १ आणि भाजपाला ३ जागी विजय मिळाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना त्यांच्या काटोल मतदारसंघातील जिल्हा परिषदेच्या जागांवर पराभव पत्करावा लागला.
काटोल मतदारसंघात भाजपाने राष्ट्रवादी च्या उमेदवारांचा पराभव केला. त्यामुळे मतदारांनी अनिल देशमुख यांना त्यांच्याच मतदारसंघात धक्का दिला आहे.कॉग्रेसचे विद्यमान मंत्री सुनिल केदार यांनी त्यांचा सावनेर मतदारसंघातील जिल्हा परिषदेच्या जागांवर विजय मिळवून त्यांचा गड राखला आहे. तर भाजपला मोठा पराभव पत्करावा लागला आहे. या निवडणुकीत शिवसेनेला त्यांचं खातंही उघडता आले नाही. शिवसेनेला एकही जागा जिंकता आलेली नाही. नागपूर जिल्हा परिषदेत काँग्रेसचे ९, राष्ट्रवादीचे २ तर शेकापची १ उमेदवार निवडून आला हा आमचा एकजूटीचा विजय असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे.
ओबीसी समाजावर भाजपाने केलेल्या अन्यायाचे उत्तर मतदारांनी दिले त्यामुळे नागपूर जिल्हा परिषदेत भाजपचा पराभव झाला आहे अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे माजी मंत्री राजेन्द्र मुळक यांनी दिली आहे. तर काँग्रेसने सत्तेचा आणि पैशाचा अमर्याद वापर केला. १७ जागांच्या निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादीने पन्नासहून अधिक आमदार प्रचाराला जुंपले त्यामुळेच भाजप पराभूत झाला, असे भाजपचे राज्य महासचिव चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे.
जिल्हा परिषद निवडणुकीत ( Nagpur ZP ) भाजपचा पुन्हा एकदा सपशेल पराभव झाला तर काँग्रेसची पुन्हा एक 'हाती' सत्ता आली. नागपूर जिल्हा परिषदेत काँग्रेसचे १० पैकी ९, राष्ट्रवादीचे ५ पैकी २ तर शेकापचा १ उमेदवार निवडून आला. तर भाजपाचे १० पैकी फक्त २ उमेदवार निवडून आले. पारडसिंगा येथून मिनाक्षी संदीप सरोदे व सावरगाव सर्कलमधून पार्वती काळबांडे हे दोन भाजप सदस्य विजयी झाले. २०१२ ते २०१७ अशी पाच वर्षे भाजपची सत्ता होती. ओबीसी आरक्षणाचा मुद्दा पहिले उच्च न्यायालय व नंतर सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्यामुळे भाजपला २ वर्षे मुदतवाढ मिळाली. त्या नंतर झालेल्या निवडणूकीत काँग्रेसने ३० जागा जिंकत सत्ता मिळवली.
राज्यातील सत्ता निसटल्यानंतर एकेक करीत स्थानिक स्वराज्य संस्थातील सत्ता हातातून जात असल्यामुळे आपल्या गृह जिल्ह्यातील जिल्हा परिषद हातातून जाऊ नये यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. राज्यातील अतिवृष्टीच्या पाहणी दौऱ्यामुळे फडणवीसांना प्रचाराला वेळ देता आला नाही. तरी माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह टिमने जिल्हा पिंजून काढला. नागपूर जिल्हा परिषदेत भाजप व शिवसेना स्वतंत्र लढली तर काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी होती.
जागा १६
निकाल प्राप्त १६
भाजप-०३
शिवसेना-००
राष्ट्रवादी-२
काँग्रेस- ९
शेकप – ०१
गोंडवाना गणतंत्र पार्टी ०१
इतर-००.