पुढारी ऑनलाईन डेस्क : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते आज ( दि.१४) अयोध्येतील स्वच्छता मोहिमेला प्रारंभ झाला. ही मोहीम २१ जानेवारीपर्यंत चालणार आहे. योगी आदित्यनाथ यांनी अयोध्येतील लता मंगेशकर चौकातून स्वच्छ तीर्थ मोहिमेचा शुभारंभ केला. स्वच्छता अभियानासाठी आलेल्या महापालिकेच्या सफाई वाहनांना त्यांनी हिरवा झेंडा दाखवला. यानंतर लता चौकात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. ( Cleanliness campaign in Ayodhya launched by CM Yogi Adityanath)
योगी आदित्यनाथ यांनी लता मंगेशकर चौकातील फरशीची स्वच्छता केली. तसेच हाताने कचरा उचलून कचराकुंडीत टाकत शहरातील नागरिकांना स्वच्छतेचा संदेश दिला. जनता अवध इंटर कॉलेज, शिवदयाल जैस्वाल इंटर कॉलेज, महाराजा इंटर कॉलेज आणि महाराजा पब्लिक स्कूलमधील ४०० मुलांनीही स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला. मुख्यमंत्री योगी यांनी शाळकरी मुले आणि स्वच्छता कर्मचार्यांशीही संवाद साधला आणि त्यांना सांगितले की, अयोध्या स्वच्छ करण्यासाठी तुम्हा सर्वांना पुढे येऊन आपली जबाबदारी पार पाडावी लागेल. ( Cleanliness campaign in Ayodhya launched by CM Yogi Adityanath)
उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी लखनौमधील बाळकेश्वर हनुमान मंदिराची स्वच्छता केली. ते म्हणाले की, 30 डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'स्वच्छ मोहल्ला, स्वच्छ गाव, अयोध्या धाम, जय श्री राम'चा नारा दिला होता आणि देशातील जनतेला स्वच्छता अभियानात सहभागी होण्याचे आवाहन केले होते. अयोध्येत होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाच्या पहिल्या 11 दिवसांचे विधी पंतप्रधान मोदी करत असून देशातील मंदिरांमध्ये स्वच्छता मोहीम राबवण्याचे आवाहन केले आहे. यामध्ये भाजपचे सर्व कार्यकर्ते योगदान देत आहेत.
शनिवारी 50 ई-बस अयोध्याधाम बस स्थानकावर पोहोचल्या. यापूर्वी अयोध्येत शंभर ई-बस चालवण्याचा प्रस्ताव होता. आता 21 ते 23 जानेवारी दरम्यान येथे दोनशे ई-बस धावणार आहेत. नागरी वाहतूक संचालक डॉ.राजेंद्र पानसिया यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे एकूण आठ एकर जागा आणि चार्जिंग स्टेशनची व्यवस्था करण्यास सांगितले आहे. ई-बसच्या मार्गांसह भाडे यादीही प्रस्तावित करण्यात आली आहे.