पुढारी ऑनलाईन डेस्क: काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी हे सध्या लडाखच्या दौऱ्यावर आहेत. दरम्यान त्यांनी येथील नागरिकांची भेट घेतली. तेव्हा येथील नागरिकांनी चिनी सैन्य या भागात घुसले असल्याचे सांगितले. चिनी सैन्याने भारताच्या हद्दीत घुसून येथील नागरिकांच्या चराईच्या जमिनी हिसकावून घेतल्या आहेत, अशी माहिती राहुल यांनी (Rahul Gandhi) माध्यमांशी बोलताना दिली. यासंदर्भाचे वृत्त एएनआयने दिले आहे.
पीएम मोदी म्हणाले होते की, चीनने येथील एक इंचही जमीन हिसकावून घेतली नाही. पण हे खरे नाही. येथील नागरिकांशी बोलले असता, ही गोष्ट असत्य असल्याचे जाणवते, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. लडाखच्या लोकांच्या खूप तक्रारी आहेत. येथे मोठ्या प्रमाणात बेरोजगारीचा प्रश्न आहे. ते सध्या मिळत असलेल्या दर्जावर आनंदी नाहीत. राज्य हे नोकरशाहीने नाही तर, लोकांच्या आवाजाने येथील लोकांचे प्रश्न सोडवले पाहिजेत. यासाठी येथे योग्य प्रतिनिधीची आवश्यकता आहे, असेही येथील लोकांना वाटत असल्याचे राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी म्हटले आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी त्यांचे वडील आणि माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना त्यांच्या जयंतीनिमित्त लडाखमधील पेंगॉन्ग तलावाच्या काठावर श्रद्धांजली वाहिली. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी वढेरा आणि रॉबर्ट वाड्रा यांनी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त दिल्लीतील वीरभूमी येथे त्यांना पुष्पहार अर्पण केला.