नागपूर; पुढारी वृत्तसेवा : शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी वंचित बहुजन आघाडीशी युती करण्याचे संकेत दिले आहेत, याकडे कसे बघता असे विचारले असता उद्धव ठाकरे आता अबू आझमी आणि असदुद्दीन ओवेसी यांच्यासोबतही युती करु शकतात, अशी उपरोधिक टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी केली. या सोबतच राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार मजबूत असून 20 ते 25 आमदारांचे छुपे समर्थन सरकारला असल्याचा दावा त्यांनी केला.
सरकार पाडण्याच्या भानगडीत खासदार संजय राऊत यांनी पडू नये, असा सबुरीचा सल्ला देण्यासही ते विसरले नाहीत. गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्या 'शिवशक्ती-भिमशक्ती'च्या नव्या राजकीय आघाडीची चर्चा आहे. यासंदर्भात नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलताना बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी उद्धव ठाकरे यांना हा टोला लगावला.
राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार दोन महिन्यात पडेल, पुन्हा भविष्यात मविआचा मुख्यमंत्री येईल, असा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला. याविषयी बोलताना बावनकुळे यांनी आमचे सरकार भक्कम आहे. 164 आमदारांची संख्या पुढे 184 पर्यंत जाईल, असा दावाही केला. अजूनही 20-25 आमदारांचे छुपे समर्थन सरकारला असल्याने सरकार पाडण्याच्या भानगडीत संजय राऊत यांनी पडूच नये, असेही ते म्हणाले.
राज्यपाल कोश्यारी यांनी कुठेही छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केलेला नाही. राज्यपाल छत्रपती शिवरायांच्या शिवनेरी किल्ल्यावर गेले होते. शिवरायांचे देशाच्या इतिहासातील महत्त्व कोणीही कमी करु शकत नाहीत. शरद पवार आणि नितीन गडकरी यांचा गौरव करणे ठीक आहे. मात्र, छत्रपतींबद्दल राज्यपाल बोलल्याने जो वाद निर्माण झाला, त्यावर आम्ही कालच भूमिका स्पष्ट केली आहे. आम्ही सर्व कार्यकर्ते छत्रपतींच्या विचारांवरच काम करीत असल्याचे बावनकुळे म्हणाले.
हेही वाचलंत का ?