पुढारी ऑनलाईन डेस्क : बिहारचे मुख्यमंत्री आणि संयुक्त राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा नितीशकुमार (Nitish Kumar Resigns) यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अटकळींना त्यांनी पूर्णविराम देत भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये (रालोआ) सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. नितीशकुमार यांनी राज्यपालांकडे राजीनामा दिला असून नव्या जदयु भाजप सरकारचा शपथविधी आज सायंकाळी होण्याची शक्यता आहे.
बिहारमधील राजकीय खेळ शिगेला पोहोचला आहे. नितीशकुमार यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा (Nitish Kumar Resigns) दिला असून त्यांनी लालू यादव यांच्या नेतृत्वाखालील आरजेडीशी महायुती तोडून भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएमध्ये पुन्हा सामील होत आहेत. ते भाजपसोबत नवीन सरकार स्थापणार असल्याचे समोर आले आहे. रविवारी सकाळी जेडीयूच्या आमदारांची बैठक पार पडली. त्यानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार राजीनामा देण्यासाठी राजभवनात गेले आणि त्यांनी राज्यपालांकडे राजीनामा दिला. संध्याकाळी चार वाजता ते नवीन मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार असल्याचे समोर आले आहे.
नितीश यांना रोखण्याची आरजेडीची रणनीती सध्या तरी कामी आलेली नाही. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा हेही पाटणा येथे पोहोचले आहेत. शपथविधी सोहळ्याला ते उपस्थित राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, आधी राजीनामा द्या, मग तुम्हाला पाठिंब्याचे पत्र दिले जाईल अशी अट भाजपने नितीश कुमार यांच्यासमोर अट ठेवली होती.
७२ वर्षीय नितीशकुमार हे बिहारच्या राजकारणातील ताकदवान नेते म्हणून ओळखले जातात. २०१३ पासून त्यांचे 'एनडीए' ते 'यूपीए' ते महागठबंधन असे चारवेळा 'यू टर्न' झाले आहेत. आधी ते 'यूपीए'मध्ये होते. त्यानंतर त्यांनी 'एनडीए'ची कास धरली. त्यानंतर तेथून बाहेर पडत महागठबंधनमध्ये प्रवेश केला. आतासुद्धा इंडिया आघाडीच्या स्थापनेत त्यांचा महत्त्वाचा वाटा राहिला; पण आता तेच पुन्हा 'एनडीए'त परत जाण्याची शक्यता आहे.
हेही वाचा :