नागपूर; पुढारी वृत्तसेवा : गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपाने मिळवलेला विजय ऐतिहासिक असून विरोधकांचे डोळे उघडणारा आहे. गुजरातच्या जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासात्मक राजकारणाला पाठिंबा दिला, असल्याचे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. गुजरात निवडणूक निकालाच्या पार्श्वभुमीवर ते माध्यमांशी बोलत होते.
पुढे बोलताना बावनकुळे म्हणाले, गुजरातमध्ये भाजपाचा मोठा विजय होणार असल्याचे आपण पूर्वीच सांगितलं होत. राहुल गांधी कधीही देशात काँग्रेसचे नेते म्हणून पुढे येऊ शकत नाहीत. काँग्रेसला त्यांच्या नेतृत्वात विजय मिळू शकत नाही, असा दावा त्यांनी यावेळी केला.
"आप" ने प्रचारादरम्यान खूप मोठ्या घोषणा केल्या होत्या. मात्र त्यांना यश मिळाले नाही. राहुल गांधी यांनी कितीही यात्रा केल्या तरी त्यांचा प्रभाव दिसत नाही. गुजरातमध्ये पराभव होईल, हे गांधीना माहित असल्यानेच त्यांनी गुजरातमध्ये प्रचार केला नाही, असाही टोला बावनकुळे यावेळी लगावला.
संजय राऊत यांना धमकीचे फोन आले असतील, तर त्यांनी पोलिसात तक्रार करून पोलिसांचे संरक्षण मागावे. मात्र ते मीडियासमोर येऊन बोलत आहेत. त्यांनी संरक्षण मागितले तर उपमुख्यमंत्री फडणवीस त्यांना संरक्षण देण्यास सक्षम आहेत. ते रोज नेत्यांना शिव्या शाप देतात. राऊत यांनी याप्रकारचे बोलणे टाळावे. तीन महिने तुरूंगात राहून ते कैद्यांची भाषा वापरत असल्याचं वक्तव्य बावनकुळे यांनी केलं तसेच राऊत यांनी आता विधायक कामे करावीत, असा सबुरीचा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.