पुढारी ऑनलाईन डेस्क: जळगाव येथे काल (दि.१०) झालेल्या सभेत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपविरोधी विधान केले होते. ठाकरेंनी 'राम मंदिराच्या उद्धाटनानंतर गोध्रा सारखी दुर्घटना पुन्हा घडू शकते' असे भाकित करणारे विधान केले होते. या विधानावरून राजकीय वातावरण तापले असून भाजप नेते रविशंकर प्रसाद यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला. (BJP Vs Uddhav Thackeray)
उद्धव ठाकरेंच्या विधानावर बोलताना भाजप नेते रविशंकर प्रसाद म्हणाले, "उद्धव ठाकरेंनी केलेले विधान हे लज्जास्पद आणि अशोभनीय टिप्पणीआहे. देशातीलमोदींच्या विरोधातील आघाडी मतांसाठी कोणत्याही स्तराला जाऊ शकते. त्यामुळे मी प्रभु रामाला प्रार्थना करू इच्छितो की, त्यांना थोडी बुद्धी द्यावी." (BJP Vs Uddhav Thackeray)
असे काहीही घडू नये. उद्धव ठाकरे यांनी अशी कल्पना करणे पूर्णपणे चुकीचे, बालिश आणि मूर्खपणाचे आहे. त्यांनी असे म्हणू नये. राम मंदिराबाबत बाळासाहेब ठाकरेंच्या भावना उद्धव ठाकरेंच्या विरुद्ध आहेत. ते काँग्रेससोबत गेल्याने ते आता काँग्रेसची भाषा बोलू लागले आहेत, असे मत रामजन्मभूमीचे (अयोध्या) मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांनी व्यक्त केले आहे.
ठाकरेंच्या उद्धव बाळासाहेब गटाची सभा जळगावमध्ये रविवारी (दि.१०) सभा पार पडली. येत्या काही दिवसांत राममंदिराचे उद्घाटन होणार आहे. उद्घाटन समारंभाला देशभरातून अनेक हिंदूंना बोलावले जाण्याची शक्यता आहे. समारंभ संपल्यानंतर लोक परत येत असताना ते गोध्रा घटनेसारखे काहीतरी करू शकतात, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले हाेते.