पुढारी ऑनलाइन डेस्क : Bihar News बिहारची राजधानी पाटणाला लागून असलेल्या दानापूरमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. दानापूर येथील शहापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीजवळ रविवारी दोन बोटींची धडक झाली. जवळपास 50-55 लोक बोटींवर होते. यापैकी 40 जणांची सुटका करण्यात आली आहे. 10 हून अधिक लोक अजूनही बेपत्ता असल्याची माहिती आहे. सध्या त्यांचा शोध सुरू आहे. ही घटना आज सोमवारी सकाळी घडली.
दानापूरचे एसडीएम घटनास्थळी उपस्थित होते. ते म्हणाले की, 10 लोक बेपत्ता आहेत आणि बेपत्ता झालेल्यांचा शोध घेण्यासाठी शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. बोटीवरील लोक दाऊदपूर येथील रहिवासी आहेत.
प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, लोक डायराहून तीन बोटीतून चारा कापून गंगा पार करत होते. दरम्यान, नदीच्या जोरदार प्रवाहामुळे दोन बोटींची धडक झाली. बोटीवरील बहुतांश लोक दानापूर शाहपूर भागातील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच आजूबाजूला मोठी गर्दी झाली. त्यानंतर शहापूर पोलिसांनी घटनास्थळ गाठून जमाव हटवून शोध सुरू केला.