पुणे : पुढारी वृत्तसेवा : यंदा विदर्भालाही मागे टाकत कमाल तापमानात मध्य महाराष्ट्राने विक्रम केला. सोलापूरचे तापमान सलग पाचव्या दिवशी राज्यात सर्वोच्च ठरले. मंगळवारी तेथील पारा ४२ अंशांवर होता. दरम्यान, गुढीपाडव्याच्या दिवशी राज्यातील काही भागांत पावसाने हजेरी लावली. लातूरमध्ये दुपारी मुसळधार पावसाने दाणादाण उडवून दिली. उन्हाळ्यात राज्यात विदर्भ नेहमी कमाल तापमानात आघाडीवर असतो. मात्र, यंदा विदर्भासह मराठवाड्याच्या काही भागांत पाऊस पडत असल्याने तेथील कमाल तापमान किंचित घटले आहे. मध्य महाराष्ट्रात मात्र पावसाचा थेंबही नाही. त्यामुळे सोलापूरचे तापमान गेल्या पाच दिवसांपासून राज्यात सर्वांत जास्त नोंदविले जात आहे. तेथील पारा सतत ४२ ते ४३ अंशांवर आहे.
सोलापूर ४२, पुणे ३८.५, मुंबई ३२.४, अहमदनगर ३८, कोल्हापूर ३८.६, महाबळेश्वर ३२.७, मालेगाव ४१.८, नाशिक ३७.६, सांगली ३९.७, सातारा ३८.७, छत्रपती संभाजीनगर ३८.६, परभणी ३८, बीड ३९.६, अकोला ३८.९, अमरावती ३७.४, चंद्रपूर ३७, गोंदिया ३७, नागपूर ३४.८, वर्षा ३६.१ आणि यवतमाळ ३७.
मराठवाडा आणि लगतच्या भागांत वाऱ्याची चक्रीय स्थिती तयार झाल्याने मंगळवारी मराठवाडा आणि विदर्भात पावसाने हजेरी लावली. त्यामुळे त्या भागातील कमाल तापमानात किंचित घट झाली. मध्य व उत्तर महाराष्ट्रात मात्र उष्णतेची लाट तीव्र आहे.
विदर्भात पावसाचा मुक्काम १३ एप्रिल, तर मराठवाड्यात १२ एप्रिलपर्यंत वाढला आहे. मध्य महाराष्ट्रात मात्र पावसाचा अंदाज १२ एप्रिलपर्यंत असला, तरी पाऊस पडत नसल्याने उष्णतेचा कहर वाढला आहे.
हेही वाचा