पुढारी ऑनलाईन डेस्क : पंजाबमधील भटिंडा मिलिटरी स्टेशनवर (Bathinda Military Station firing incident) बुधवारी ( १२ एप्रिल ) चार जवानांची हत्या झाला होती. आता या प्रकरणाचे गूढ उलगडले आहे. या प्रकरणी पंजाब पोलिसांनी घटनेचा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असलेल्या लष्करी जवानाला अटक केली आहे. पूर्ववैमनस्यातून त्याने चार जवानांची गोळ्या झाडून हत्या केल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. या घटनेच्या तपासादरम्यान आर्टिलरी युनिटमधील गनर देसाई मोहन नावाच्या व्यक्तीने इन्सास रायफल चोरणे आणि त्याच्या चार सहकाऱ्यांना मारण्यात त्याचा सहभाग असल्याची कबुली दिली आहे. हे कृत्य त्याने वैयक्तिक कारणांमुळे अथवा पूर्व वैमनस्यातून केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.
या प्रकरणी माहिती देताना पोलीस अधीक्षक गुलनीत सिंग खुराना यांनी सांगितले की, पंजाब पोलिसांचे पथक या घटनेचा तपास करत आहे. तपासादरम्यान संशयावरुन प्रत्यक्षदर्शी साक्षीदार जवानाची सखोल चौकशी करण्यात आली. आरोपीने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. पूर्ववैमनस्यातून चार जवानांना मारण्यासाठी संबंधित जवानाने आधी रायफल चोरली. या नंतर त्याच रायफलने चौघांचीही गोळ्या झाडून हत्या केली.
या प्रकरणी मोहन देसाई हा एकमेव साक्षीदार होता. चार जवानांची हत्या झाल्याची माहिती त्यानेच वरिष्ठ अधिकार्यांना दिली होती. पांढरा कुर्ता पायजमा घालून आलेल्या दोघांनी जवानांची हत्या करुन पलायन केल्याची माहितीही त्याने दिली होती. तसेच सर्वांनी मास्क घातला होता अशीही माहिती त्याने दिली होती. तसेच दोन मारेकर्यांपैकी एकाचा हातात बंदूक तर दुसर्याच्या हातात कु-हाड होती, अशी माहिती देत त्याने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला होता.
या घटनेच्या प्रत्यक्षदर्शींनी युनिटचे मेजर शुक्ला यांना सांगितले की, बुधवारी दोनजण भटिंडा मिलिटरी स्टेशनमध्ये पांढरा कुर्ता पायजमा घालून आले. अंदाधूंद गोळीबार करुन ते पळून गेले होते. या प्रकरणी मेजर शुक्ला यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन दोन अज्ञात आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला होता.
चार जवानांची हत्या झाल्याचे घटनेने खळबळ उडाली होती. पोलीस आणि लष्कराच्या अधिकाऱ्यांनी कँटच्या प्रत्येक गेटचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. गुरुवार आणि शुक्रवारी, लष्करी अधिकारी आणि पंजाब पोलिसांच्या पथकाने कॅन्टमधील सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. कोणीही संशयित व्यक्तीने परिसरात प्रवेश केला नव्हता. ज्यांनी जवानांना मारले ते आतून आले होते, हे अधिकाऱ्यांच्या तपासात स्पष्ट झाले होते.
घटनेच्या दिवशी संध्याकाळी लष्कराने कॅन्टोन्मेंटच्या जंगलातून एक रायफल जप्त केली. जे फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आले. छावणीत राहणाऱ्या सर्व लष्करी जवानांचे रेकॉर्डही लष्कराने तपासले होते. एसपीडी अजय गांधी यांच्या नेतृत्वाखाली पंजाब पोलिसांचे पथकही तपासात सामील होते.
हेही वाचा :