बारामती पुढारी वृत्तसेवा: राज्यातील महाविकास आघाडी सरकारने शेतकरीविरोधी निर्णय घेतले आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कोल्हापूर येथे होणाऱ्या राज्य कार्यकारिणी बैठकीमध्ये त्याची चिरफाड करु, असा इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला.
बारामतीमध्ये एका कार्यक्रमानिमित्ताने आले असता माध्यमांशी बाोलताना शेट्टी यांनी राज्य शासनावर नाराजी व्यक्त केली. शिवाय हे शेतकऱ्यांचे सरकार म्हणायचे का? असा सवालही त्यांनी केला. भूमी अधिग्रहण कायदा दुरुस्ती करत महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांचा मोबदला ७० टक्क्यांनी कमी केला. एफआरपी दोन टप्प्यात देण्याचा बेकायदेशीर निर्णय झाला. बाजार समितीतून शेतकऱ्यांच्या मतदानाचा हक्क काढून घेण्याचा मुद्दा, असे अनेक मुद्दे आहेत, असेही त्यांनी सांगितले.
ऊस दर नियंत्रण समिती दुबळी आहे. ती कारखानदारांसमोर काही बोलत नाही. असे अनेक प्रश्न घेवून आमचा लढा सुरुच राहिल.अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीच्या भरपाईबाबत तोंडाला पाने पुसली गेली. मग हे सरकार नेमके शेतकऱ्यांचेच आहे का? असा सवालही राजू शेट्टी यांनी केला.
हेही वाचा