पुढारी ऑनलाईन डेस्क : shakib al hasan : टी 20 विश्वचषक स्पर्धेत टीम इंडिया 2 नोव्हेंबरला बांगलादेश विरुद्ध आपला चौथा सामना खेळणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना अॅडलेडच्या मैदानावर रंगणार आहे. या सामन्यापूर्वी बांगलादेश संघाचा कर्णधार शकीब अल हसनने क्रिकेट जगताला धक्का देणारे विधान केले आहे. त्यामुळे एकप्रकारे खळबळ माजली आहे.
टी 20 विश्वचषक स्पर्धेत द. आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात पराभव पत्करावा लागल्यानंतर भारताचा पुढचा सामना बांगलादेशविरुद्ध आहे. बुधवारी (2 नोव्हेंबर) अॅडलेडमध्ये खेळला जाणारा हा सामना रोहित ब्रिगेडसाठी खूप महत्त्वाचा आहे. द. आफ्रिकेविरुद्ध पराभव झाल्याने स्पर्धेची उपांत्य फेरी गाठण्याच्या टीम इंडियाच्या मार्गात अडचणी निर्माण झाल्या आहेत. पुढील सामन्यात बांगलादेशला हरवून उपांत्य फेरी गाठण्याचा भारताचा प्रयत्न असेल, मात्र सामन्यापूर्वी बांगलादेशचा कर्णधार शकीब अल हसनने (shakib al hasan) भारताला एक इशारा दिला. भारतीय संघाने मोठा उलटफेर होण्यासाठी सज्ज राहावे, असे विधान त्याने केले आहे.
भारताविरुद्ध खेळल्या जाणार्या सामन्यापूर्वी शाकिब अल हसनने (shakib al hasan) आपली टीम टी-20 विश्वचषक जिंकण्यासाठी आली नसल्याचं म्हटलं आहे. तो म्हणाला, 'आम्ही इथे टी-20 वर्ल्ड कप जिंकण्यासाठी आलेलो नाही. टीम इंडिया इथे जिंकण्यासाठी आली आहे. पण बांगलादेशने भारताला पराभूत केले तर तो स्पर्धेतील सर्वात मोठा उलटफेर असेल.' शाकिबच्या या वक्तव्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.
टी 20 विश्वचषक स्पर्धेच्या सुपर 12 फेरीत टीम इंडियाने 3 पैकी 2 सामने जिंकले आहेत. तर बांगलादेशने देखील 3 पैकी 2 सामने जिंकले आहेत. ग्रुप 2 मध्ये बांगलादेश तिसऱ्या क्रमांकावर आहे. अशा स्थितीत बांगलादेशचा संघही उपांत्य फेरीतील आपले स्थान निश्चित करू शकतो. मात्र, टीम इंडियाला पराभूत करणे बांगलादेशसाठी सोपे नसेल. टीम इंडिया आणि बांगलादेश यांच्यात टी 20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत एकूण 11 सामने खेळले गेले आहेत. टीम इंडियाने यापैकी 10 सामने जिंकले आहेत, तर बांगलादेशने फक्त 1 सामना जिंकला आहे. आकडेवारीवर नजर टाकली तर या सामन्यात टीम इंडियाचे पारडे जड असणार आहे.
केएल राहुल, रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, अक्षर पटेल, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल, ऋषभ पंत (विकेटकीपर), दीपक हुडा, हर्षल पटेल.
नजमुल हुसेन शांतो, सौम्या सरकार, लिटन दास, शाकिब अल हसन (कर्णधार), अफिफ हुसैन, यासिर अली, नुरुल हसन (विकेटकीपर), मोसाद्देक हुसेन, मेहदी हसन मिराज, तस्किन अहमद, शोरफुल इस्लाम, मुस्तफिजुर रहमान, हसन महमूद, नसूम अहमद, इबादोत हुसेन.