पुढारी ऑनलाइन डेस्क : Bageshwar Dham : पंडित धीरेंद्र शास्त्री यांच्या कार्यक्रमात मोठी चेंगराचेंगरी झाल्याची माहिती समोर येत आहे. पंडित धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर बाबा यांचा आज ग्रेटर नोएडा येथे कार्यक्रम होता. या कार्यक्रमात चेंगराचेंगरी झाल्याची माहिती मिळत आहे. एबीपी हिंदीच्या वृत्तानुसार, या चेंगराचेंगरीत अनेकजण बेशुद्ध पडले, तर कार्यक्रम स्थळी उघड्या पडलेल्या विजेच्या तारांमुळे अनेकांना विजेचा धक्का लागल्याची माहिती येत आहे. तर घटनास्थळी अनेक रुग्णवाहिकांना बोलवावे लागल्याचे समजत आहे.
झी हिंदुस्तानच्या माहितीनुसार, नोएडा येथील जैतपूर गावात पंडित धीरेंद्र शास्त्री यांच्या श्रीमदभागवत कथा सुरू आहे. या कथेदरम्यान आज बुधवारी पंडित धीरेंद्र यांच्या दिव्य दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. या दिव्य दरबारात अनेक भाविक श्रद्धाळू मोठ्या संख्येने पोहोचले होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 12 वाजल्यापासून बागेश्वर धाम सरकार यांचा दिव्य दरबार सजवण्यात आला होता. यावेळी लाखो भाविक पंडित धीरेंद्र यांच्या दर्शनासाठी दरबारात पोहोचले होते.
मोठ्या प्रमाणात आलेल्या भाविकांवर नियंत्रण ठेवणे अशक्य होत होते. जैतापूर येथील मेट्रो डेपोपासून काही अंतरावर बांबांचा दरबार भरवण्यात आला होता. आयोजकांच्या दाव्यानुसार काही एकर जागेवर हा मांडव टाकण्यात आला आहे. यामध्ये 20 लाखांपेक्षा जास्त भाविकांची बसण्याची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच भक्तांसाठी भंडाऱ्याचे देखील आयोजन करण्यात आले होते. भाविकांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही देखील बसवण्यात आले आहेत.
बागेश्वर बाबांच्या दर्शनासाठी भाविकांची झालेली आलोट गर्दी अनियंत्रित झाल्याने चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत आठ जण बेशुद्ध झाले. त्यांना अँब्युलन्सने रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. राजकीय आयुर्विज्ञान संस्थेत तीन महिला आणि एका पुरुषाला भरती करण्यात आले. तर एका महिलेला उपचारानंतर घरी पाठविण्यात आले. इमरजन्सी विभागाच्या डॉक्टर रुचि सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, गर्दीमुळे चार जणांना श्वास गुदमरण्याचा त्रास झाला होता. सध्या रुग्णालयात भरती करण्यात आलेले तीनही रुग्णांची प्रकृती सध्या स्थिर आहे.
यापूर्वी दिल्लीतील रामलीला मैदानावर आयोजित हनुमंत कथेत चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळीही परिस्थिती अशी होती की 11 वाजण्यापूर्वीच संपूर्ण सभास्थळ लोकांच्या गर्दीने खचाखच भरले होते आणि सभास्थळाच्या बाहेर केलेल्या प्रवेशद्वारासह कार्यक्रमस्थळाभोवती लाखो लोक उभे होते. चेंगराचेंगरीची परिस्थिती पाहून सर्वांनी घरी बसून टीव्हीवर कथा ऐकावी, पंडालमध्ये मोठी गर्दी असते. इथे येऊ नका. असे आवाहन आयोजकांना करावे लागले.
हे ही वाचा :