पुढारी ऑनलाईन डेस्क : Ashwin and Kumble : टीम इंडियाचा अनुभवी फिरकीपटू आर अश्विनने नागपूर आणि दिल्ली कसोटी सामने जिंकण्यात मोलाची भूमिका बजावली. त्याने एकूण 14 विकेट घेतल्या. अश्विन आता तिसर्या कसोटीत उतरण्यासाठी सज्ज झाला असून तो पुन्हा कांगारू फलंदाजांना घाम फोडेल असा विश्वास आहे. इंदूर कसोटीपूर्वी अश्विन आणि माजी फिरकीपटू अनिल कुंबळे यांच्यातील एक रंजक योगायोग जुळून आला आहे.
अश्विनने आतापर्यंत 90 कसोटी सामने खेळले असून त्याने 170 डावांमध्ये 463 विकेट मिळवल्या आहेत. आता हा एक विचित्र योगायोग आहे की कुंबळे यांनी 170 कसोटी डाव खेळले तेव्हा त्यांच्या नावावर 463 विकेट्सही होत्या. तसे, भारताचा सर्वात यशस्वी गोलंदाज कुंबळे यांनी आपल्या कारकिर्दीत 132 कसोटी सामन्यांमध्ये 619 बळी घेतले. अश्विन आणि कुंबळे यांच्यापेक्षा केवळ श्रीलंकेचा माजी दिग्गज फिरकीपटू मुथय्या मुरलीधरन (593) याने 170 डावांत जास्त विकेट घेतल्या होत्या. या यादीत द. आफ्रिकेचा माजी वेगवान गोलंदाज डेल स्टेन 430 वळी मिळवून तिसऱ्या स्थानावर तर श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू रंगना हेराथ (433) चौथ्या स्थानावर आहे.
अश्विनने नागपूर कसोटीत पाच विकेट्स घेतल्या होत्या. जर अश्विनने इंदूर कसोटीच्या एका डावात पाच बळी मिळवले तर तो भारताकडून सर्वाधिक पाच बळी घेणारा गोलंदाज बनेल. तो कुंबळे यांना मागे टाकेल. अश्विनने भारतातील कसोटी क्रिकेटमध्ये एकूण 25 वेळा 5 विकेट्स घेतल्या आहेत. कुंबळेंनी भारतात असाच पराक्रम केला आहे. याशिवाय अन्य एका बाबतीत अश्विन कुंबळे यांना मात देऊ शकतो. तिसऱ्या कसोटीत 9 विकेट्स घेतल्यानंतर अश्विन ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सर्वोच्च विकेट टेकर भारतीय गोलंदाज ठरेल. कुंबळे यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध 111 कसोटी बळी घेतले आहेत.