पुढारी ऑनलाईन : महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांना मुंबईच्या विशेष पीएमएलए न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. न्यायालयाकडून त्यांच्या जामिनातील काही अटी शिथिल करण्यात आल्या आहेत. त्यांना मुंबई सोडून देशांतर्गत कोणत्याही ठिकाणी प्रवास करण्याची मुभा PMLA न्यायालयाकडून देण्यात आली आहे, असे वृत्त 'एएनआय'ने दिले आहे.
माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (एनसीपी) नेते अनिल देशमुख यांना १०० कोटींच्या भ्रष्टाचारप्रकरणी अटक करण्यात आली होती. याप्रकरणात त्यांची सीबीआय आणि ईडी चौकशी सुरू होती. त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. १२ डिसेंबर 2022 रोजी त्यांना १ लाख रुपयाच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला होता. जामीन आदेशात न्यायालयाच्या पूर्वपरवानगीशिवाय मुंबई सोडायता येणार नाही, असे सांगण्यात आले होते.
यानंतर आज (दि.२५) मुंबईतील विशेष पीएमएलए न्यायालयाने अनिल देशमुख यांच्या जामीन आदेशातील अटी शिथिल केल्या. जामीनावर बाहेर असलेल्या देशमुख यांना १८ जून पर्यंत देशातील इतर ठिकाणी देखील जाण्याची परवानगी देण्यात आली असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.