वंडी : पुढारी वृत्तसेवा : भिवंडी महाविद्यालयाच्या बाहेर धक्का लागून झालेल्या वादातून मारहाण केलेल्या युवकाचा दुर्दैवी अंत झाल्याची घटना घडली आहे. मात्र या घटनेमुळे धामणकर नाका ते वर्हाळा देवी रोड कामतघर या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
संबंधित बातम्या
14 फेब्रुवारी रोजी भिवंडी महाविद्यालयाच्या बाहेर धक्का लागल्याच्या किरकोळ वादातून झालेल्या शुल्लक हाणामारीच्या घटनेत काही युवकांनी या मुलाचे अपहरण केले होते. यादरम्यान त्यास जबर मारहाण केल्याने मुंबई येथे त्याच्यावर उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान बुधवारी त्याचा दुर्दैवी अंत झाला. संकेत भोसले असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे.
या प्रकरणातील आरोपी फरार असून मारहाण करणार्या आरोपींंना पोलीस जोपर्यंत अटक करत नाहीत, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी संतप्त भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.
14 फेब्रुवारी रोजी महाविद्यालयातील युवकांना संकेत व काही युवकांचा धक्का लागला असता त्यांच्यामध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. त्यानंतर या युवकाने आपल्या सोबत आठ दहा जणांना घेऊन येत त्याठिकाणी मारहाण केली. संकेतचे अपहरण करून त्यास बेदम मारहाण ही करण्यात आली.
दरम्यान संतप्त नागरिकांनी धामणकर नाका ते कामतघर रोड रस्त्यावरील दुकाने वाहतूक बंद पाडून संताप व्यक्त केला. या प्रकरणी पोलीस स्थानकात गुन्हा नोंद केला आहे.
धक्का लागल्याच्या रागातून संकेतचे अपहरण करून त्यास बेदम मारहाण करण्यात आली. त्यामध्ये जबर जखमी झाल्याने त्याला उपचाराकरिता मुंबई येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता सात दिवसांनी त्याची जगण्याची झुंज अपयशी ठरली व त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
जोपर्यंत आरोपीस अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा इशारा महेंद्र गायकवाड यांनी दिला आहे. या दुर्दैवी घटनेनंतर धामणकर नाका परिसरात दुकाने रिक्षा बंद करण्यात आल्या असून अनेक वाहनांवर दगडफेक करण्यात आल्याच्या घटना घडल्या आहेत. नागरिकांनी कायदा हातात न घेण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.