Latest

कांदा, कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी अंबादास दानवे आक्रमक

मोहन कारंडे

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : राज्यातील कांदा, कापूस उत्पादक शेतकऱ्यांना योग्य हमीभाव मिळाला पाहिजे. अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांचे प्रश्न तातडीने सोडविले पाहिजेत यासाठी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज सभागृहात आक्रमक भूमिका घेतली. त्यांनी सभागृहाचे सर्व कामकाज बाजूला ठेवून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करण्याची मागणी लावून धरली.

बार्शीतील कांदा उत्पादक शेतकऱ्याला दोन रुपये चेक दिल्याची बाब दानवे यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. पाकिस्तान, कझाकिस्तान, तुर्कीस्तान, नेदरलँड आदी देशांत व आंतरराष्ट्रीय बाजारात कांद्याची कमतरता मोठया प्रमाणात आहे. मात्र राज्यातील कांदा उत्पादक हमीभाव न मिळाल्यामुळे शेतावर नांगर फिरवत आहे. कांदा निर्यात करण्यासाठी सरकारने पावले उचलावी व नाफेड मार्फत कांदा खरेदी करावा, अशी मागणी दानवे यांनी केली.

अमरावतीत सोमवारी शेतकऱ्यांवर झालेला लाठीचार्ज प्रकरण देखील दानवे यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप त्यांनी केला. शेतकरी गुन्हेगार, दहशतवादी आहेत का? त्यांच्यावर लाठीचार्ज का केला जातोय? असा सवाल उपस्थित केला. ऑस्ट्रेलियातून कापूस आयात करून सरकार राज्यातील शेतकऱ्यांवर अन्याय करत आहे. १२ ते १४ हजार कापसाला भाव मिळत होता, मात्र आता ७ ते ७.५ हजार इतका भाव खाली आला आहे. कापसाला हमी भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी घरात कापूस साठवून ठेवला, त्यामुळे शेतकऱ्यांना अनेक आरोग्याच्या समस्येला सामोरे जावे लागत असल्याचे दानवे यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणले.

यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील कांद्याची स्थिती योग्य असल्याचे मान्य केले. नाफेडमार्फत कोणत्याही अटी व शर्तीशिवाय कांदा खरेदी केला जाईल व याबाबत केंद्र सरकारकडे चर्चा केली जाईल, असे सांगितले.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT