पुढारी ऑनलाईन डेस्क : आपल्या देशात कोट्यधीश व अब्जाधीशांची संख्या हजारोच्या घरात आहे. त्यापैकी यावर्षी ६ हजार ५०० कोट्यधीश नागरीक परदेशात स्थायिक होतील, असे हेन्ली प्रायव्हेट वेल्थ मायग्रेशन रिपोर्ट २०२३ मध्ये नमूद केले आहे. यंदा जगातील सर्वाधिक कोट्यधीशांचे स्थलांतर हे चीनमधून होईल. चीनमधून (China) अन्य देशात स्थायिक होण्याची ( Migration ) संख्या ही १३ हजार ५०० इतकी असेल. दरम्यान, आश्चर्याची गोष्ट म्हणजे, श्रीमंत व्यक्ती भारतात ( India) परतण्याचा एक लक्षणीय कल आहे. देशातील राहणीमानाचा दर्जा जसजसा वाढेल तसा श्रीमंत लोक मोठ्या संख्येने भारतात परततील, असाही अंदाज नवीन पाहणीत व्यक्त करण्यात आला आहे.
हेन्ली प्रायव्हेट वेल्थ मायग्रेशन रिपोर्टमध्ये म्हटलं आहे की, शिक्षण आणि रोजगार या कारणास्तव परदेशात स्थायिक होण्याचे प्रमाण अधिक आहे. केवळ भारतातच नाही तर जगातील बहुतांश देशातील कोट्यवधीश हे आपला मूळ देश सोडून अन्य देशात स्थायिक होण्यास प्राधान्य देत आहेत. या यादीत भारत दुसर्या स्थानावर तर चीन पहिल्या स्थानावर आहे.
यावर्षी चीनमूधन १३ हजार ५०० लोक परदेशात कायमस्वरुपी स्थायिक होतील. मागील वर्षी चीनमधील ही संख्या १० हजार ८०० इतकी होती. तर भारतातून कायमस्वरुपी पदेशात स्थायिक झालेल्यांची संख्या ७ हजार ५०० इतकी होती. या स्थलांतर होणाऱ्या देशांच्या यादीत ब्रिटन आणि रशियाचा अनुक्रमे तिसरा आणि चौथा क्रमांक लागतो. यावर्षी ब्रिटनमधून ३,२०० तर रशियातून तीन हजार नागरिक कायमस्वरुपी स्थलांतर होतील, असेही या रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आले आहे.
हेन्ली प्रायव्हेट वेल्थ मायग्रेशन रिपोर्टनुसार, विविध देशांतून स्थलांतर करणारे नागरिक हे अमेरिका, ऑस्ट्रेलिया, युएई, सिंगापूर आणि स्वित्झर्लंड या देशांमध्ये स्थायिक होण्यास पसंती देत आहेत. कोरोना काळात स्थलांतरीत नागरिकांची
संख्या रोडावली होती. मात्र २०२२ पासून पुन्हा एकदा यामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होताना दिसत आहे. जगभरातून 2023 आणि 2024 मध्ये अनुक्रमे 122,000 आणि 128,000 नागरिक स्थलांतर करतील, असा अंदाज आहे.
हेन्ली प्रायव्हेट वेल्थ मायग्रेशन सीईओ ज्युर्ग स्टीफन यांनी म्हटलं आहे की, गेल्या दशकात कोट्यधीशांच्या स्थलांतरात सातत्याने वाढ झाली आहे. कोरोना काळात यामध्ये घट झाली होती. मात्र आता पुन्हा एकदा यामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. ऑस्ट्रेलियामध्य स्थलांतर होण्यास सर्वाधिक पसंती मिळत आहे. तर चीनमधून सर्वाधिक स्थलांतर होण्याचा वेग वाढला आहे. दरम्यान, आश्चर्याची गोष्ट म्हणजे, श्रीमंत व्यक्ती भारतात परतण्याचा एक लक्षणीय कल आहे. देशातील राहणीमानाचा दर्जा जसजसा वाढतो, तसतसे श्रीमंत लोक मोठ्या संख्येने भारतात परततील, असा अंदाज या रिपोर्टमध्ये व्यक्त करण्यात आला आहे.
हेही वाचा :