पुढारी ऑनलाईन डेस्क : आज देशातील दूरसंचार उद्योगाकडून 130 कोटी भारतीयांना 5G च्या रूपाने एक अद्भुत भेट मिळत आहे. 5G ही देशाच्या दारात नव्या युगाची दार ठोठावत आहे. ही नव्या संधींची सुरुवात आहे. यासाठी मी प्रत्येक भारतीयाचे खूप खूप अभिनंदन करतो. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवातील 1 ऑक्टोबर 2022 तारखेची इतिहासात नोंद हाेईल, असे प्रतिपादन आज (दि.1) पंतप्रधान नरेंद्र यांनी केले. दिल्लीतील प्रगती मैदानावर सुरू असलेल्या इंडिया मोबाईल काँग्रेस कार्यक्रमात (5G launch Live updates) 5-G सेवेच्या शुभारंभ प्रसंगी ते बाेलत हाेते.
यावेळी पंतप्रधान नरेंद्र माेदी म्हणाले, "आज देशातील दूरसंचार उद्योगाकडून 130 कोटी भारतीयांना 5G च्या रूपाने एक अद्भुत भेट मिळत आहे. 5G ही नव्या युगाची दार ठोठावत आहे, ही नव्या संधींची सुरुवात आहे. यासाठी मी प्रत्येक भारतीयाचे खूप खूप अभिनंदन करतो. भारताच्या 21 व्या शतकातील विकसनशील क्षमता पाहण्यासाठी आजचा दिवस विशेष आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षातील 1 ऑक्टोबर 2022 ही तारीख इतिहासात नोंदवली जाणार आहे."
"नवा भारत हा केवळ तंत्रज्ञानाचा ग्राहक राहणार नाही, तर त्या तंत्रज्ञानाच्या विकासात आणि अंमलबजावणीत सक्रीय भूमिका बजावेल. भविष्यातील वायरलेस तंत्रज्ञानाची रचना करताना, त्या संबंधित उत्पादनात भारताची मोठी भूमिका असेल. 2G, 3G, 4G च्या काळात भारत तंत्रज्ञानासाठी इतर देशांवर अवलंबून होता; पण 5G ने भारताने एक नवा इतिहास रचला आहे. 5G सह, भारत प्रथमच दूरसंचार तंत्रज्ञानामध्ये जागतिक मानक स्थापित करत आहे", असेही पंतप्रधान माेदी म्हणाले.
"भारत आघाडीवर आहे. आज इंटरनेट वापरणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला हे समजत आहे. 5G इंटरनेटची संपूर्ण रचना बदलून टाकेल. डिजिटल इंडियाबद्दल बोलताना काही लोकांना वाटते की, ही फक्त सरकारी योजना आहे; पण डिजिटल इंडिया हे केवळ नाव नाही तर देशाच्या विकासाचे मोठे व्हिजन आहे. लोकांसाठी काम करणारे, लोकांशी जोडून काम करणारे ते तंत्रज्ञान सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणे हे या व्हिजनचे ध्येय आहे," असेही त्यांनी या वेळी नमूद केले.
"2014 मध्ये आपल्या देशातून मोबाइल फोनची निर्यात शून्य हाेती. आज हजारो कोटी रुपयांचा मोबाइल फोन निर्यात करणारा देश, अशी आपली ओळख बनली आहे.साहजिकच या सर्व प्रयत्नांचा परिणाम यंत्राच्या किंमतीवर झाला आहे. आता आम्हाला कमी किंमतीत अधिक सुविधा मिळू लागल्या आहेत. सरकारने घरोघरी वीज पोहोचवण्याची मोहीम सुरू केल्याने हरघर जल अभियानाच्या माध्यमातून प्रत्येकाला शुद्ध पाणी देण्याच्या मिशनवर काम झाले. तसेच उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून देशातील सर्वात गरीब व्यक्तीला गॅस सिलिंडर पोहोचवण्यात आले. त्याचप्रमाणे आमचे सरकार सर्वांसाठी इंटरनेट या ध्येयावर काम करत आहे," असेही त्यांनी सांगितले.
एक काळ असा होता जेव्हा मूठभर उच्चभ्रू वर्ग गरीब लोकांच्या क्षमतेवर शंका घेत असे. गरिबांना डिजिटलचा अर्थही कळणार नाही, अशी शंका त्यांनी व्यक्त केली जात हाेती; पण देशाच्या सामान्य माणसाच्या समजुतीवर, त्याच्या विवेकावर, जिज्ञासू मनावर माझा नेहमीच विश्वास राहिला आहे. सरकारने स्वतः पुढे जाऊन डिजिटल पेमेंटचा मार्ग सोपा केला आहे. सरकारने स्वतः ॲपद्वारे नागरिक-केंद्रित वितरण सेवेला प्रोत्साहन दिले; मग ते शेतकरी असो किंवा छोटे दुकानदार, आम्ही त्यांना ॲपद्वारे त्यांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्याचा मार्ग दिला आहे, असेही पंतप्रधान माेदी म्हणाले.
आज आपले छोटे व्यापारी, लघु उद्योजक, स्थानिक व्यापारी आणि कारागिर आदींना डिजीटल इंडियाने एक व्यासपीठ दिलं. बाजार दिला. आज तुम्ही स्थानिक बाजारात जावा तिथे तुम्हाला रस्त्यावरील छोटा दुकानदारही म्हणेल "कॅश नको UPI करा". हा बदलच सांगतो की, जेव्हा सुविधा सुलभ होतात तेव्हा आपले विचार किती सशक्त होतात. आज दुरसंचार क्षेत्रातील जी क्रांती पाहत आहात हे याची प्रचिती आहे. जेव्हा सरकार चांगल्या नियतीने काम करते तेव्हा नागरिकांना ही त्यांची नियत बदलायला वेळ लागत नाही
5-जी सेवा सुरू करण्यासाठी पहिल्या टप्प्यात 13 शहरांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये दिल्ली, मुंबई, कोलकाता आदी मेट्रो शहरांचा समावेश आहे. त्यानंतर दोन वर्षांत 5-जी कनेक्टिव्हिटी देशभरात वेगाने विस्तारली जाईल. पहिल्या टप्प्यात अहमदाबाद, मुंबई, पुणे, बंगळूर, चंदीगड, चेन्नई, दिल्ली, गांधीनगर, गुरुग्राम, हैदराबाद, जामनगर, कोलकाता आणि लखनौ या 13 शहरांमध्ये 5-जी सेवा सुरू केली जाणार आहे.
हेही वाचलंत का?