पुढारी ऑनलाईन डेस्क : एखाद्या चित्रपटावर निर्माता जास्तीत जास्त किती पैसे खर्च करू शकतो? (20years@Devdas) भव्य-दिव्य चित्रपट बनवण्यासाठी निर्माते कुठलीही कसर सोडत नाहीत म्हणा. आपला चित्रपट भव्य व्हावा, यासाठी जीवतोड मेहनत केली जाते. असाच प्रकार २० वर्षांपूर्वी घडला होता. आजच्या दिवशी 'देवदास' हा चित्रपट रिलीज झाला होता आणि प्रत्येकाच्या तोंडी केवळ आणि केवळ 'देवदास' हा शब्द घुमू लागला. देवदास या चित्रपटाला आज २० वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्ताने स्वत:ला या चित्रपटातील मुख्य नायिका माधुरी दीक्षित हिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केलीय. माधुरीने या चित्रपटात चंद्रमुखीची भूमिका साकारली होती. या चित्रपटातील तिने काही खास पाच डायलॉग्ज शेअर केले आहेत. (20years@Devdas)
हिंदी चित्रपटसृष्टीत काही असे चित्रपट आले, ज्यांना आयकॉनिक म्हटलं गेलं. खूप कमी चित्रपट निर्माते असतील की, ते अशा प्रकारच्या चित्रपटांचा रीमेक बनवू शकतील. असाच एक आयकॉनिक चित्रपट 'देवदास' आजपासून २० वर्षांपूर्वी चित्रपटगृहांमध्ये रिलीज झाला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन संजय लीला भन्साळींनी केलं होतं. या चित्रपटामध्ये शाहरुख खान, ऐश्वर्या राय आणि माधुरी दीक्षितच्या दमदार अभिनयाने सर्वांना मंत्रमुग्ध केलं. या चित्रपटात या कलाकारांचा अभिनय तर होताच, पण कलाकारांच्या भव्य सेट आणि वेशभूषेनेही रसिकांना वेड लावले होते.
'देवदास'चे बजेट ५० कोटींवर पोहोचले होते. असा दावा केला जातो की, या चित्रपटाच्या शूटिंगसाठी एका दिवसाचा खर्च सात लाख रुपये यायचा, जो त्या काळात खूपच जास्त होता. 'सिलसिला ये चाहत' या गाण्यातील ऐश्वर्या आणि माधुरीच्या सुंदर जुगलबंदीची आणि 'डोला रे डोला'मधील ऐश्वर्या आणि माधुरीच्या सुंदर जुगलबंदीची क्रेझ आजही प्रेक्षकांमध्ये पाहायला मिळत आहे.
या चित्रपटाच्या शूटिंगसाठी सहा वेगवेगळे सेट तयार करण्यात आले होते. 'देवदास' चित्रपटाशी संबंधित अनेक कथा आहेत. याबद्दल खूप कमी लोकांना माहिती असावी. भन्साळी आणि शाहरुखची जोडी पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एकत्र येणार होती. चित्रपटातील एकापेक्षा एक मोठे स्टार्समुळे सर्वांना उत्सुकता लागून होती. मीडिया रिपोर्टनुसार, चित्रपटाच्या शूटिंगवेळी निर्माता भरत शाह यांना अटक करण्यात आली होती. या चित्रपटासाठी पाण्यासारखा पैसा निर्मात्याने घातला होता. पारोचा (ऐश्वर्या राय) पॅलेस तीन कोटींमध्ये पूर्ण झाला. चित्रपटात चंद्रमुखीची (माधुरी दीक्षित) खोली १२ कोटींमध्ये बांधली गेली होती. पाहणाऱ्याचे डोळे दिपून जावेत असा देवदासचा सेट होता. इतकचं नाही तर वेशभूषेकडे विशेष लक्ष देण्यात आलं होतं.
माधुरी, ऐश्वर्या यांच्या पेहराव्याकडे सर्वाधिक लक्ष देण्यात आलं होतं. या चित्रपटात माधुरी दीक्षितने प्रसिद्ध डिझायनर संदीप घोसला यांनी तयार केलेल्या 'काहे छेड छेड मोहे गरवा लगाई'मध्ये ३० किलोचा हिरवा लेहेंगा परिधान केला होता. मात्र, नंतर हा लेहेंगा १६ किलोमध्ये तयार करण्यात आला.
या चित्रपटात पारोसाठी अर्थातचं ऐश्वर्या रायनेही एकापेक्षा एक सुंदर साडी नेसली होती. भन्साळींना चित्रपटात ऐश्वर्याला परफेक्ट लूक द्यायचा होता आणि त्यासाठी त्यांनी ऐश्वर्याच्या वेशभूषेची जबाबदारी नीता लुल्लाला दिली. नीला लुल्ला यांनी उत्तमोत्तम साडी खरेदी करण्यासाठी कोलकात्याच्या अनेक ट्रीप केल्याचं म्हटलं जातं. संजय लीला भन्साळी यांनीही ऐश्वर्यासाठी कोलकाता ते मुंबई दरम्यनच्या जवळपास ६०० साड्या आणल्या असल्याचे सांगितले जाते. तसेच चित्रपटाच्या शूटिंगसाठी रोज ७ लाख रुपये खर्च आला असल्याचेही सांगितले जाते. भरत शाह तुरुंगात गेल्यामुळे 'देवदास'चे शूटिंग थांबले होते. शाह यांची सुटका झाल्यानंतर पुन्हा शूटिंगला सुरुवात झाली. अखेर २००० साली हा चित्रपट पडद्यावर रिलीज झाला.
त्याकाळात या तोडीचा कोणताही चित्रपट रिलीज झाला नाही. ५० कोटी बजेटमध्ये आलेल्या या चित्रपटाने १०४ कोटांची कमाई केली होती. शिवाय 'देवदास'ने अनेक पुरस्कार आपल्या नावे केले होते.