पुढारी ऑनलाईन डेस्क : माजी पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी दापोली येथील भाषणात केलेल्या भाषणानंतर किशोरी पेडणेकर यांनी आज (दि. २१) पत्रकाराशी संवाद साधला. "उद्धव ठाकरे हे नक्की बाळासाहेबांचा मुलगा आहे का?" रामदास कदम यांच्या या प्रश्नावर त्यांनी प्रतिक्रिया दिली. यावेळी त्या म्हणाल्या की, "हे इतकं घाणेरडं आहे, ज्यांच्या हातचं खाल्लं आहे त्यांच्याच चारित्र्यावर शिंतोडे उडवत आहेत," अशा शब्दात पेडणेकर यांनी कदम यांचा खरपूस समाचार घेतला.
उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केल्यानंतर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर चांगल्याच आक्रमक झाल्या. उद्धव ठाकरेंनी तुम्हाला मोठं केलं आहे, त्यांच्या बद्दल अशी भाषा वापरणं चुकीचं आहे. आज किचनपर्यंत जाण्याची यांची जीभ सैल सुटली. एवढा लाळघोटेपणा करणारा नेता गेला बर झालं ही घाण आमच्या पक्षातून निघून गेली, अशी टीका त्यांनी यावेळी केली. तसेच दसरा मेळाव्यावरून सुरू असलेल्या वादावरही पेडणेकरांनी प्रतिक्रिया दिली. शिवसेना नेमकी कोणाची? या वादावरही आपला न्यायालयावर विश्वास असल्याचं पेडणेकर यावेळी म्हणाल्या.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर पक्षप्रमुख झालेल्या उद्धव ठाकरे यांनीच शिवसेना संपविण्याचे काम केले. उद्धव ठाकरे रुग्णालयात दाखल असताना त्यांनी त्यांच्या सल्लागारांशी सल्लामसलत करून आपल्याला व आपला मुलगा आमदार योगेश याला शिवसेनेतून संपविण्याचा कट रचला,'' असा आरोप कदम यांनी दापोली येथे बोलत असताना केला होता.
हेही वाचा