Afghanistan Pakistan Conflict: पाकिस्तान सध्या मोठ्या संकटात सापडला आहे. अफगाणिस्तानसोबत पाकिस्तानचं खुलं युद्ध सुरू झालं आहे. पाकिस्तान लष्कर सध्या अफगाणिस्तान सीमेवर लढतंय. मात्र गेल्या काही दिवसांपासून बलुचिस्तानमध्ये देखील पाकिस्तानी लष्कराला मोठे हादरे बसत आहेत. बीएलए अर्थात बलुचिस्तान लिबरेशन आर्मी रोज पाकिस्तानी सरकारी कार्यालये आणि लष्करी तळांवर हल्ला करत आहे. त्यामुळं आता पाकिस्तानला दोन्ही फ्रंटवर लढावं लागत आहे. त्यामुळं आसिम मुनीर यांचे लष्कर आधीच थकलं आहे.
२१ फेब्रुवारी २०२६ पासून पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या नंगरहार, पक्तिया आणि खोस्त भागात जोरदार हवाई हल्ले सुरू केले होते. पाकिस्तानचा दावा होता की टीटीपी या ठिकाणी लपून आमच्या देशात हल्ले घडवून आणत आहे. आता पाकिस्तानच्या या हवाई हल्ल्याला तालिबानने जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. २६-२७ फेब्रुवारी अफगाण योद्धे पाकिस्तानी बॉर्डर क्रॉस करून पाकिस्तानी लष्कराच्या पोस्टवर हल्ले करत आहेत.
अफगाणिस्ताननं ४० पाकिस्तानी सैनिक मारल्याचा दावा केला आहे. यानंतर पाकिस्ताननं काबुल आणि कंधार इथं एअर स्ट्राईक करत बॉम्ब वर्षाव केला. आता पाकिस्तानचे संरक्षण मंत्री हे आम्ही अफगाणिस्तानसोबत खुल्या युद्धात आहोत असं सांगत आहेत. आता युद्ध फक्त सीमेपुरतं मर्यादित नाही असं सांगत पाकिस्तानला दररोज गोळीबार आणि मिसाईलचा धोका आहे असा दावा करत आहेत.
बलुचिस्तान पाकिस्तानमधील सर्वात मोठा प्रांत आहे. या प्रांतात बीएलए ही संघटना कार्यरत असून ते विद्रोहाची तीव्र लढाई कत आहेत. बीएलएने जानेवारी आणि फेब्रुवारी २०२६ मध्ये सर्वात मोठा हल्ला करत पोलीस स्टेशन, बँक, लष्करी तळ आणि अनेक घरांवर हल्ला केला होता. त्यात ३० पेक्षा जास्त सामान्य नागरिक आणि सौनिक मारले गेले होते.
पाकिस्तानी लष्करानं प्रत्युत्तरात २०० बीएलए विद्रोहींना ठार केल्याचा दावा केला होता. मात्र असं असलं तरी बीएलएचे हल्ले काही थांबण्याचं नाव घेत नाहीयेत. बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानी लष्कराला २४ तास अलर्ट मोडवर रहावं लागतं. त्यामुळं त्यांचे सैनिक थकले आहेत. त्यांना शस्त्र आणि पैसा या दोन्ही गोष्टींची कमतरता जाणवत आहे.
आता अफगाणिस्तान मोर्चा देखील ओपन झाला असून अफगाणिस्तानसोबतचीही लढाई ही दीर्घकाळ सुरू राहण्याची शक्यता आहे. पाकिस्तान आणि अफगाणिस्तान हे २६०० किलोमीटरची सीमा शेअर करतात. आता तिथं देखील पाकिस्तानी सैनिक हाय अलर्ट मोडवर असणार आहेत. त्यामुळं पाकिस्तानी लष्कराची ताकद ही बलुचिस्तान आणि अफगाणिस्तान अशा दोन ठिकाणी विभागली गेली आहे.
युद्धाचा आर्थिक भार हा मोठा असतो रोज हवाई हल्ला, बॉम्ब आणि मिसाईल यांचा खर्च प्रचंड असतो. पाकिस्तानची अर्थव्यवस्था आधीच लुळी पांगळी झाली आहे. त्यांना सतत IMF कडून कर्ज घ्यावं लागतं. आता देशांतर्गत विद्रोह वाढत आहे. बलुचिस्तानमधील लोकं पाकिस्तानी लष्कराच्या विरोधात आहेत. टीटीपी देखील पंजाब आणि खैबर पख्तुनख्वा या ठिकाणी सतत हल्ले करत आहेत. जर आता युद्ध लांबलं तर सैनिक थकतील आणि युद्धापासून पळ काढतील.
पाकिस्तानचा भारतासोबत देखील संघर्ष आहे. जर भारतानं देखील आपला मोर्चा खोलला तर पाकिस्तानची अवस्था बिकट होईल.
पाकिस्तानी आणि आंतरराष्ट्रीय जाणकारांच्या मते सध्याच्या घडीला तरी पाकिस्तानचे तुकडे होणार नाहीत. मात्र हे युद्ध २ ते ३ महिने लांबलं तर पाकिस्तानसाठी मोठा धोका आहे. अमेरिका आणि चीन या दोन देशांनी शांततेचं आवाहन केलं आहे. चीन पाकिस्तानचा सर्वात जवळचा मित्र आहे. मात्र तो देखील युद्ध बंद करून अर्थव्यवस्था वाचवा असं सांगत आहे.
अफगाणिस्तान सीमेवर तुफान गोळीबारी सुरू आहे. बलुचिस्तानमध्ये ऑपरेशन सुरू असून बीएलएचे हल्ले मात्र काही केल्या थांबत नाहीयेत. आसिम मुनीर संपूर्ण दिवस मिटिंग करत होते. मात्र त्यांच्यासमोरील मार्ग खूप खडतर आहे. अफगाणिस्तानसोबतचं युद्ध पाकिस्तानसाठी खूप खतरनाक ठरू शकतं. बीएलएच्या हल्ल्यांनी लष्कर आधीच बेजार झालं आहे. जर अफगाणिस्तानचा मोर्चा देखील चिघळला तर पाकिस्तानी लष्कर, अर्थव्यवस्था आणि पाकिस्तानची एकता यांच्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. सध्या तरी पाकिस्तानचे तुकडे होण्याची शक्यता कमी असली तरी भविष्यात हा धोका कायम आहे.