Nepal Flood Trishuli 3A Tunnel Rescue Pudhari
आंतरराष्ट्रीय

Nepal Flood Rescue: 10 दिवस महापुरात अडकले अन् अचानक आवाज ऐकू आला; नेपाळच्या बोगद्यातून दोन कामगारांची थरारक सुटका

Nepal Flood Trishuli 3A Tunnel Rescue: नेपाळमधील त्रिशूली-3ए जलविद्युत प्रकल्पाच्या बोगद्यात अडकलेल्या दोन कामगारांची तब्बल 10 दिवसांनी सुखरूप सुटका करण्यात आली.

Rahul Shelke

Nepal Flood Trishuli 3A Tunnel Rescue: नेपाळमध्ये 10 दिवसांपूर्वी आलेल्या भीषण पूर आणि नैसर्गिक आपत्तीनंतर एक आशादायी घटना समोर आली आहे. त्रिशूली-3ए जलविद्युत प्रकल्पाच्या बोगद्यात अडकलेल्या दोन कामगारांची तब्बल 10 दिवसांनी सुखरूप सुटका करण्यात आली आहे. अंधारात आणि अत्यंत कठीण परिस्थितीत जीवन-मरणाची झुंज देणाऱ्या या दोघांना शुक्रवारी बचाव पथकाने सुरक्षितपणे बाहेर काढले.

वाचवण्यात आलेल्या कामगारांची ओळख 45 वर्षीय कबीर महारजन आणि 30 वर्षीय संजय साह अशी झाली आहे. महारजन हे प्रकल्पात मेकॅनिकल सुपरवायझर, तर साह हे फोरमॅन म्हणून कार्यरत होते.

बोगद्यातून आवाज ऐकू आला अन् आशा जागी झाली

दोन्ही कामगार बेपत्ता झाल्यापासून नेपाळ लष्कराच्या नेतृत्वाखाली सुरक्षा दलांकडून त्यांचा शोध सुरू होता. बचाव मोहिमेदरम्यान विशेष उपकरणांची मदत घेण्यात आली. अखेर शुक्रवारी बचाव पथकाला बोगद्याच्या आतून काही आवाज ऐकू आले. त्यामुळे कामगार जिवंत असल्याची आशा निर्माण झाली.

बचाव पथकाने बोगद्यात अडकलेल्या व्यक्तींशी संपर्क साधला. “घाबरू नका, आम्ही तुम्हाला वाचवण्यासाठी आलो आहोत,” असे सांगत पथकाने त्यांना धीर दिला. त्यावर आतूनही प्रतिसाद मिळाला. यानंतर नेपाळ लष्कर आणि सशस्त्र पोलीस दलाच्या जवानांनी बचावकार्य अधिक वेगाने सुरू केले.

26 ऑगस्टच्या पुरामुळे बोगद्याचा मार्ग झाला होता बंद

26 ऑगस्ट रोजी रसुवा भागात भोटेकोशी नदीला आलेल्या भीषण पुरामुळे मोठ्या प्रमाणात पाणी बोगद्यात शिरले. त्यामुळे बोगद्याचा मार्ग बंद झाला आणि त्यात काम करणारे काही कामगार अडकले.

पूर आणि ढिगाऱ्यामुळे निर्माण झालेल्या आव्हानात्मक परिस्थितीतही सुरक्षा दलांनी शोधमोहीम सुरू ठेवली. तब्बल 10 दिवसांनंतर बोगद्यातून कामगारांच्या जिवंत असल्याच्या खुणा मिळणे हे बचाव पथकासाठी मोठे यश मानले जात आहे.

नेपाळमध्ये मोठी जीवितहानी

दरम्यान, 26 ऑगस्ट रोजी आलेल्या विनाशकारी पुरामुळे नेपाळमध्ये मोठ्या प्रमाणावर जीवित आणि वित्तहानी झाली आहे. नेपाळ पोलिसांच्या माहितीनुसार, या आपत्तीत आतापर्यंत 1,290 जणांचा मृत्यू झाला असून शेकडो लोक अद्याप बेपत्ता आहेत.

नेपाळ-तिबेट सीमेच्या जवळ मोठ्या प्रमाणात बर्फ आणि दगडांचा ढिगारा घसरल्यानंतर या आपत्तीची सुरुवात झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर उत्तर आणि मध्य नेपाळमधील अनेक शहरे आणि गावांना पुराचा मोठा फटका बसला.

या भीषण आपत्तीच्या पार्श्वभूमीवर 10 दिवसांनी दोन कामगार जिवंत सापडणे ही नेपाळसाठी मोठी दिलासादायक बातमी आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT