Bangladesh Measles
नवी दिल्ली: बांगलादेशात गोवरने आतापर्यंत २५० हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये लहान मुलांचे प्रमाण सर्वाधिक आहे. या भीषण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेने शेजारील देशांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. विशेषतः बांगलादेशच्या सीमा भारताला लागून असल्याने भारतातही या संसर्गाचा धोका निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
WHO नुसार, बांगलादेशातील ६४ पैकी ५८ जिल्ह्यांमध्ये गोवरचा प्रसार झाला आहे. बांगलादेशात लसीकरणाचा दर उच्च होता, परंतु गेल्या दोन वर्षांत, विशेषतः २०२५ मध्ये त्यात झालेली घट या मृत्यूंना कारणीभूत ठरली आहे. २६ एप्रिलच्या अहवालानुसार, यावर्षी १५ मार्चपासून ४३ जणांचा गोवरने मृत्यू झाला आहे, तर २१६ संशयास्पद मृत्यूंची नोंद झाली आहे. एकूण रुग्णांपैकी ९१ टक्के मुले १ ते १४ वर्षे वयोगटातील आहेत. तारिक रहमान यांच्या नेतृत्वाखालील 'बीएनपी' सरकार सध्या सहा महिन्यांच्या बालकांसाठी आपत्कालीन लसीकरण मोहीम राबवत आहे.
WHO ने सीमावर्ती भागात संसर्गाचा धोका उच्च असल्याचे म्हटले आहे. ढाका, चट्टोग्राम आणि सिलहट यांसारखी मोठी शहरे आंतरराष्ट्रीय प्रवासाची मुख्य केंद्रे आहेत, ज्यामुळे हा आजार पसरण्याची शक्यता जास्त आहे. भारताच्या सीमेला लागून असलेल्या जशोर आणि चापाइनवाबगंज या जिल्ह्यांमध्ये गोवरचे प्रमाण जास्त असल्याने भारताला अधिक सतर्क राहावे लागेल.
ज्येष्ठ विषाणूशास्त्रज्ञ डॉ. जेकब जॉन यांच्या मते, भारतात लसीकरणाचे प्रमाण उत्तम असल्याने राष्ट्रीय स्तरावर महामारी येण्याची शक्यता कमी आहे. सरकारी आकडेवारीनुसार, २०२४-२०२५ मध्ये भारताचे पहिल्या डोसचे लसीकरण ९३.७% आणि दुसऱ्या डोसचे ९२.२% इतके आहे.
गोवर हा एक अत्यंत संसर्गजन्य विषाणूजन्य आजार आहे. तो हवेद्वारे पसरतो. तीव्र ताप, वाहणारे नाक, डोळे लाल होणे, खोकला आणि तोंडात पांढरे डाग आणि काही दिवसांनी अंगावर लाल पुरळ अशी गोवरची लक्षणे आहेत. गोवरमुळे न्यूमोनिया, जुलाब, मेंदूदाह आणि अंधत्व येऊ शकते. यावर कोणताही विशिष्ट अँटीव्हायरल उपचार नाही; त्यामुळे लसीकरण हाच एकमेव प्रभावी उपाय आहे.
भारताने २०२६ पर्यंत गोवर आणि रुबेला निर्मूलनाचे लक्ष्य ठेवले आहे. केंद्र सरकारच्या सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रमांतर्गत, गोवर आणि रुबेलाची लस दोन डोसमध्ये दिली जाते. २०२२ मध्ये मुंबई आणि महाराष्ट्रातील काही भागांत गोवरचा उद्रेक झाला होता, ज्याचे मुख्य कारण कोविड दरम्यान लसीकरणात आलेला व्यत्यय हे होते. मात्र, त्यानंतर भारताने लसीकरण मोहिमेवर अधिक भर दिला आहे.