Indian crew rescued Oman ship attack : ओमानच्या किनारपट्टीजवळ 'एमटी अल गैया' (MT El Gaia) या व्यापारी जहाजावर रविवारी झालेल्या हल्ल्याचा भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने तीव्र शब्दांत निषेध केला आहे. या जहाजावर एकूण १४ भारतीय खलाशी तैनात होते. त्यापैकी १३ भारतीयांना सुखरूप वाचवण्यात यश आले असून, एका लापता भारतीय नागरिकाचा शोध सध्या सुरू आहे.
या हल्ल्याचा भारताने तीव्र निषेध केला आहे. परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, बेपत्ता असलेल्या एका भारतीय नागरिकाचा शोध आणि बचाव कार्य सुरू आहे. ओमानमधील भारतीय दूतावास परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असून ओमानच्या अधिकाऱ्यांशी समन्वय साधत आहे. व्यापारी जहाजे, खलाशी, नागरिक आणि नागरी पायाभूत सुविधांवरील हल्ले अस्वीकार्य असल्याचे नमूद करत, भारताने तणाव कमी करण्यासाठी त्वरित पावले उचलण्याचे तसेच संवाद व मुत्सद्देगिरीचा मार्ग अवलंबण्याचे आवाहन केले. तसेच, या भागातील आंतरराष्ट्रीय जलमार्गांवरून मुक्त व सुरक्षित नौकानयन आणि व्यापाराची वाहतूक पूर्ववत करण्याचे आवाहनही भारताने केले.
परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या अधिकृत निवेदनानुसार, ही घटना घडताच मस्कत येथील भारतीय दूतावासाने तातडीने हालचाली सुरू केल्या आहेत. दूतावास ओमानच्या स्थानिक प्रशासनासोबत सतत संपर्कात असून शोध आणि बचाव कार्यावर (Search and Rescue operation) बारकाईने लक्ष ठेवून आहे.
भारतीय नागरिकांच्या सुटका मोहिमेत मोलाचे सहकार्य केल्याबद्दल भारताने ओमान प्रशासनाचे आभार मानले आहेत. बेपत्ता खलाशाचा शोध घेण्यासाठी बचावकार्य अधिक वेगाने राबवले जात आहे.