संयुक्त राष्ट्रांमधील भारताचे कायमस्वरूपी प्रतिनिधी पर्वथनेनी हरीश file photo
आंतरराष्ट्रीय

India slams Pakistan UN: काश्मीरवर बोलून स्वतःचेच हसू करून घेतले; भारताने संयुक्त राष्ट्रांमध्ये पाकिस्तानची लायकी काढली!

भारताने संयुक्त राष्ट्रात (UN) पाकिस्तानला सुनावले आहे. अंतर्गत अपयश लपवण्यासाठी सीमेच्या आत आणि बाहेर हिंसाचार पसरवणे हा पाकिस्तानचा जुनाच पॅटर्न असल्याचा घणाघात भारताने केला.

मोहन कारंडे

India slams Pakistan at UN

न्यूयॉर्क: "ज्या देशाचा काळा इतिहास नरसंहाराने कलंकित आहे, अशा पाकिस्तानने भारताच्या अंतर्गत मुद्द्यांवर आणि मानवाधिकारांवर आम्हाला शिकवावे, हा मोठा विरोधाभास आहे," अशा कडक शब्दांत भारताने संयुक्त राष्ट्रात पाकिस्तानला सुनावले आहे. अंतर्गत अपयश लपवण्यासाठी सीमेच्या आत आणि बाहेर हिंसाचार पसरवणे हा पाकिस्तानचा जुनाच पॅटर्न असल्याचा घणाघातही भारताने केला. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या 'सशस्त्र संघर्षात नागरिकांचे संरक्षण' या विषयावरील वार्षिक खुल्या चर्चेदरम्यान भारताने आपली भूमीका स्पष्ट केली.

पाकिस्तानचा दुटप्पीपणा उघड

संयुक्त राष्ट्रातील भारताचे स्थायी प्रतिनिधी हरीश पर्वथनेनी यांनी पाकिस्तानच्या प्रतिनिधीने जम्मू-काश्मीरचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर पाकला कडक शब्दात उत्तर दिले. पर्वथनेनी म्हणाले, "नरसंहाराचा दीर्घ आणि डागाळलेला इतिहास असलेल्या पाकिस्तानने भारताच्या पूर्णपणे अंतर्गत असलेल्या विषयांवर भाष्य करावे, ही अत्यंत हास्यास्पद बाब आहे. स्वतःच्याच जनतेवर बॉम्बफेक करणाऱ्या आणि पद्धतशीरपणे नरसंहार घडवून आणणाऱ्या देशाकडून अशाच आक्रमक कृत्यांची अपेक्षा केली जाऊ शकते."

अफगाणिस्तानवरील हवाई हल्ल्याचा दाखला

या वर्षी मार्च महिन्यात पाकिस्तानने अफगाणिस्तानमध्ये केलेल्या हवाई हल्ल्यांचा संदर्भ देत भारताने पाकिस्तानचा क्रूर चेहरा जगासमोर आणला. "पवित्र रमझान महिन्यात, जेव्हा जगात शांतता आणि करुणेचे वातावरण असते, तेव्हा पाकिस्तानने काबूलमधील 'ओमिद व्यसनमुक्ती रुग्णालया'वर हवाई हल्ला केला होता, हे जग विसरलेले नाही," असे पर्वथनेनी यांनी ठणकावून सांगितले.

२६९ निष्पापांचा बळी

संयुक्त राष्ट्राच्या अफगाणिस्तानमधील साहाय्य मिशनचा दाखला देत भारताने सांगितले की, पाकिस्तानच्या या भ्याड हल्ल्यात २६९ निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागला होता, तर १२२ जण जखमी झाले होते. कोणत्याही परिस्थितीत वैद्यकीय सुविधेला लष्करी लक्ष्य बनवणे समर्थनीय ठरू शकत नाही. रात्रीच्या अंधारात निष्पाप नागरिकांना लक्ष्य करायचे आणि दुसरीकडे आंतरराष्ट्रीय कायद्याच्या गप्पा मारायच्या, हा पाकिस्तानचा निव्वळ दुटप्पीपणा आहे.

१९७१ च्या 'ऑपरेशन सर्चलाइट'ची आठवण

भारताने पाकिस्तानला त्यांच्याच इतिहासातील काळ्या पानांची आठवण करून दिली. १९७१ मधील 'ऑपरेशन सर्चलाइट'चा उल्लेख करत पर्वथनेनी म्हणाले की, पाकिस्तानने आपल्याच लष्कराद्वारे ४,००,००० महिलांवर पद्धतशीरपणे केलेल्या सामूहिक बलात्काराच्या मोहिमेला मंजुरी दिली होती. UNAMA च्या अहवालानुसार, पाकिस्तानच्या सीमापार सशस्त्र हिंसाचारामुळे ९४,००० हून अधिक अफगाण नागरिक विस्थापित झाले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT