Nepal Protests : सोशल मीडियावर घातलेली बंदी ही नेपाळ सरकारला चांगली भोवली आहे. या निर्णयाविरोधात सोमवार, ८ सप्टेंबरपासून काठमांडूमधील तरुणाई रस्त्यावर उतरली. या आंदोलनास हिंसक वळणही लागले. हिंसाचारात आतापर्यंत २० जणांचा मृत्यू झाला असून ३०० हून अधिक जण जखमी झाले आहेत. हिंसाचारानंतर गृहमंत्री रमेश लेखक यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारत राजीनामा दिला, तर परिस्थिती चिघळल्याने लष्कराने संसदेजवळील रस्त्यांचा ताबा घेतला आहे. सरकारविरोधातील आंदोलनाचे नेतृत्व ३६ वर्षीय सुदान गुरुंग करत आहेत. जाणून घेऊया त्यांच्या आजवरच्या प्रवासाविषयी....
नेपाळ सरकारने ४ सप्टेंबर २०२५ रोजी फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअॅप, यूट्यूब आणि ‘एक्स’सह तब्बल २६ सोशल मीडिया ॲप्सवर बंदी घातली. या निर्णयाविरोधात सोमवार, ८ सप्टेंबर रोजी देशभरातील तरुणाई रस्त्यावर उतरली. नेपाळमध्ये अनेक वर्षांनंतर सर्वात मोठे युवा आंदोलन झाले आहे. यानंतर पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांच्या सरकारने सोशल मीडियावरील बंदी मागे घेतल्याचे जाहीर केले. तातडीच्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर दळणवळणमंत्री पृथ्वी सुब्बा गुरुंग यांनी समाजमाध्यम मंच पूर्ववत सुरू केले जातील, अशी घोषणा केली.
नेपाळमधील तरुणांच्या आंदोलनाचे नेतृत्व हे ३६ वर्षीय सुदान गुरुंग करत आहेत. नेपाळमधील ‘द अन्नपूर्णा एक्सप्रेस’ वृत्तपत्रानुसार, २०१५ मध्ये झालेल्या भूकंपामध्ये सुदान यांचा मुलगा मृत्यूमुखी पडला. या घटनेने त्यांच्या आयुष्याची दिशा बदलली. एकेकाळी इव्हेंट मॅनेजमेंटचे काम करणारे सुदान यांनी भूकंपानंतर 'हामी नेपाळी' हे एनजीओ स्थापन केली. या एनजीओचे ते अध्यक्ष आहेत. बी. पी. कोइराला इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्सेसमधील कारभाराविरोधात झालेल्या आंदोलनाचे नेतृत्व त्यांनी केले आहे.
सुदान गुरुंग यांनी नेपाळ सरकारने समाजमाध्यमांवर बंदी घालण्यापूर्वी 'हामी नेपाळ'च्या माध्यमातून सरकारच्या धोरणांविरोधात समाजमाध्यमांचा वापर केला होता. त्यांनी सरकारविरोधात अधिकृतपणे मोर्चा काढण्यासाठी विद्यार्थ्यांना शाळेचा गणवेश घालून आणि सोबत पुस्तके घेऊन मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन केले होते. आता त्यांनी सुरू केलेले आंदोलनचे लोण देशातील विविध शहरांमध्ये पोहचले आहे. सोमवारी झालेल्या मोर्चात काठमांडूच्या रस्त्यांवर हजारो तरुणांसह शाळकरी विद्यार्थी आंदोलनात सहभागी झाले. आंदोलकांनी संसदेच्या आवारात घुसण्याचा प्रयत्न केल्याने आंदोलनाला हिंसक वळण लागले. आंदोलकांना मागे हटवण्यासाठी पोलिसांनी पाण्याचा मारा, अश्रुधुराच्या नळकांड्या आणि गोळीबारही केला. सरकारविरोधातील आंदोलनाची धग पोखरा, बुटवल, भैरहवा, भरतपूर, इटहरी आणि दमक शहरांमध्ये पसरली आहे.
या आंदोलनाचे आणखी एक कारण म्हणजे ‘नेपो किड’ नावाने व्हायरल झालेली मोहीम. या मोहिमेला ऑनलाइन आणि रस्त्यांवरही मोठा प्रतिसाद मिळाला. तरुण नेपाळींनी सुरू केलेल्या या आंदोलनात राजकारणी आणि श्रीमत न वर्गाच्या मुलांना भ्रष्टाचारातून मिळालेल्या पैशांमुळे विशेषाधिकार मिळतात, असा आरोप सुदान यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनास उतरलेल्या तरुणाईने केला आहे.