पुढारी ऑनलाईन डेस्क
लोकसभा निवडणुकीचा निकाल हा देशातील लोकांची इच्छा नेमकी काय आहे? हा दर्शवतो. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला स्वबळावर बहुमत मिळवण्यात अपयश आले. त्यानंतर लोकांच्या मनातील भाजप (BJP) आणि पीएम मोदी यांच्याबद्दलची बद्दलची भीती निघून गेली, असा दावा काँग्रेस खासदार आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला आहे. अमेरिकेच्या दौऱ्यावर असलेल्या राहुल गांधी (Rahul Gandhi US Visit) यांनी डलास, टेक्सास विद्यापीठातील विद्यार्थी तसेच भारतीय समुदायाशी संवाद साधताना भाजप सरकारवर जोरदार निशाणा साधला. भारत जोडो यात्रेने राजकारणातील प्रेमाची कल्पना सर्वांसमोर मांडली, असेही ते म्हणाले.
"निवडणूक निकालाच्या काही मिनिटांतच भारतात कोणीही भाजप अथवा पीएम मोदी यांनी घाबरलेले दिसून आले नाही. लोकसभा निवडणुकीचा निकाल हा त्यांचा अथवा काँग्रेस पक्षाचा विजय नाही तर देशातील जनतेच्या इच्छेचे प्रतिबिंब आहे." असेही राहुल गांधी म्हणाले.
राहुल गांधी यांनी यावेळी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) आणि त्यांचा पक्ष यांच्यातील वैचारिक फरकदेखील अधोरेखित केला. "आरएसएसचा विश्वास आहे की भारत ही एक कल्पना आहे आणि आम्ही भारत हा अनेक विचारांचा देश असल्याचे मानते." प्रत्येकाला सहभागी होण्याची, स्वप्ने पाहण्याची मोकळीक असायला हवी. त्यांची जात, भाषा, धर्म, परंपरा अथवा इतिहास विचारात न घेता त्यांना स्थान मिळाले पाहिजे. देशातील लाखो लोकांना स्पष्टपणे समजले की पंतप्रधान भारताच्या संविधानाला धक्का लावत आहेत. दुसरी गोष्ट घडली ती म्हणजे भाजप बद्दलची भीती नाहीशी झाली. निवडणूक निकालाच्या काही मिनिटांतच हे घडले. त्यामुळे हे मोठे यश आहे. हे देशातील जनतेचे यश आहे; ज्यांनी लोकशाहीची जाणीव करून दिली."
भारताच्या संविधानाच्या संरक्षणाबाबतचा त्यांचा संदेश निवडणुकीच्या प्रचारादरम्यान लोकांमध्ये चर्चेत राहिला. ते म्हणाले की, "निवडणुकीदरम्यान लोकांना ज्याची स्पष्टपणे जाणीव झाली, ती मी जवळून पाहिली. जेव्हा मी संविधानाचा मुद्दा उपस्थित केला; तेव्हा लोकांना मला काय म्हणायचे आहे? हे लक्षात आले."
"मला वाटते की आपल्या राजकीय व्यवस्थेत आणि सर्व राजकीय पक्षांमध्ये प्रेम, आदर आणि नम्रता दिसून येत नाही. यामुळे भारतीय राजकारणात प्रेम, आदर आणि नम्रता रुजवण्याची माझी भूमिका आहे." असेही ते म्हणाले. राहुल गांधींचा अमेरिका दौरा तीन दिवसांचा आहे. विशेष म्हणजे त्यांचा हा दौरा अमेरिका राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीपूर्वी तसेच भारतातील हरियाणा आणि जम्मू-काश्मीरमधील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर होत आहे.