पुढारी ऑनलाईन डेस्क : दहशतवादी अफझल गुरूला फाशी द्यायला नको होती,;मग त्याला सार्वजनिक ठिकाणी हार घालायला हवा होता का?, असा सवाल करत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांच्यावर निशाणा साधला. जम्मू-काश्मीरमधील एक प्रचार सभेत ते बोलत होते.
"अफजल गुरूला फाशी द्यायला नको होती. पूर्वीच्या जम्मू आणि काश्मीर सरकारने त्याला फाशी देण्यास मान्यता दिली नसती. तत्कालीन जम्मू आणि काश्मीर सरकारचा अफझल गुरूच्या फाशीशी काहीही संबंध नव्हता." असे एका वृत्तसंस्थेशी बोलताना अब्दुल्ला म्हणाले होते.
जम्मू-काश्मीरमधील रामबनमधील प्रचार सभेत बोलताना राजनाथ सिंह म्हणाले की, नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला म्हणतात की, अफजल गुरूला फाशी द्यायला नको होती. मला त्याला विचारायचे आहे की, अफझल गुरूला फाशी द्यायला नको होती, त्याला सार्वजनिक ठिकाणी हार घालायला हवा होता का?.
जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी नॅशनल कॉन्फरन्स पक्षाने काँग्रेससोबत युती केली आहे. त्यांनी त्यांच्या निवडणूक जाहीरनाम्यात म्हटले आहे की ते कलम ३७० पुन्हा लागू केले जाईल. मात्र मला सांगायचे आहे की, कलम ३७० पुनर्स्थापित करण्याचे धाडस कोणातही नाही. पूर्वी दहशतवादाचे ठिकाण म्हणून ओळखले जाणारे जम्मू-काश्मीर आता पर्यटनाचे ठिकाण बनले आहे. यापूर्वी काश्मीर खोऱ्यातील अनेक तरुणांच्या हातात पिस्तूल आणि रिव्हॉल्व्हर असायचे. आता त्याच हातांमध्ये तुम्हाला लॅपटॉप आणि कॉम्प्युटर दिसतील. हा खूप मोठा बदल आहे. २०२२ नंतर दगडफेकीची एकही घटना घडलेली नाही. जोपर्यंत भारतीय जनता पक्ष भारतात आहे तोपर्यंत कोणीही जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा ३७० कलम लागू करु शकत नाही, असेही राजनाथ सिंह यांनी यावेळी स्पष्ट केले.