Sindhudesh movement Pakistan India Pudhari
आंतरराष्ट्रीय

Sindhudesh Movement: सिंधुदेशाची मागणी नक्की काय आहे? सिंध पाकिस्तानपासून वेगळा होऊ शकतो का?

Sindhudesh movement Pakistan India: सिंध प्रांत पाकिस्तानपासून वेगळा होण्याची मागणी अनेक दशकांपासून चालू आहे आणि राजनाथ सिंह यांच्या अलीकडील विधानामुळे ही चर्चा पुन्हा पेटली आहे.

Rahul Shelke

Sindhudesh Movement Pakistan Sindh Separation India Reaction:

पाकिस्तानमध्ये वेगळ्या राष्ट्राच्या मागण्या नवीन नाहीत. 1971 मध्ये पाकिस्तानपासून वेगळा होऊन बांगलादेश तयार झाला. त्यानंतरही देशाच्या अनेक भागांत असंतोष कायम होता. यामध्ये सर्वाधिक जोर धरलेली चळवळ म्हणजे सिंधुदेश. सिंधी भाषिकांकडून स्वतंत्र सिंध राष्ट्राची मागणी अजूनही होत. आता या विषयाला नवा रंग दिला आहे भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या एका वक्तव्याने, ज्यामुळे पाकिस्तानमध्ये राजकीय अस्वस्थता अधिकच वाढली आहे.

'सिंध आमच्या सभ्यतेचा भाग' राजनाथ सिंह

एका कार्यक्रमात भाषण देताना राजनाथ सिंह म्हणाले की, “आज सिंधचा भूभाग भारतात नाही, तरीही सभ्यता आणि संस्कृतीच्या दृष्टीने सिंध नेहमी भारताचाच भाग राहिला आहे. आणि सीमारेषा कधी बदलतील हे कोणालाच माहीत नाही. कदाचित उद्या सिंध पुन्हा भारताचा भाग बनेलही.”

या विधानाचा उल्लेख करत त्यांनी लालकृष्ण अडवाणी यांच्या पुस्तकातील निरीक्षणही मांडले. 'सिंधी हिंदू आजही स्वतःला भारतापासून वेगळं समजत नाहीत.'

सिंधची लोकसंख्या

फाळणीच्या वेळी सिंध पाकिस्तानकडे गेला कारण तेथे मुस्लिम बहुसंख्य होते. आज सिंध हा पंजाब आणि बलुचिस्ताननंतर पाकिस्तानचा तिसरा सर्वात मोठा प्रांत आहे.

  • फाळणीपूर्वी: 71.5% मुस्लिम, 26.4% सिंधी हिंदू

  • फाळणीनंतर अनेक सिंधी हिंदू भारतात आले; उरलेल्यांची संख्या सतत घटत गेली.

ह्यूमन राइट्स कमीशन ऑफ पाकिस्तानच्या मते, सिंधमधील हिंदू सुरक्षित नाहीत. कराची, हैदराबाद, लरकाना, सक्खर, थट्टा, बदीन, मीरपूर खास या जिल्ह्यांत त्यांची वस्ती आहे, तरी कराचीसारख्या शहरांत इतर समुदाय वाढल्याने ते अल्पसंख्यक आहेत.

नाराजी का वाढली? सिंधी समुदायाचे आरोप

सिंधी भाषिक समुदायाचे आक्षेप असे—

  • सिंधमधील गॅस, तेल, खनिजे आणि बंदरांमधून मिळणारा महसूल केंद्र सरकार जास्त प्रमाणात घेतं.

  • कराचीमध्ये उर्दू भाषिकांची वाढ झाल्यामुळे सिंधींचा राजकीय प्रभाव कमी झाला.

  • त्यांच्या भाषेला आणि संस्कृतीला पंजाबइतके महत्त्व मिळत नाही.

  • मानवाधिकार कार्यकर्त्यांवर दडपशाही वाढली, अनेक जण बेपत्ता झाले.

या पार्श्वभूमीवर समुदायात असंतोष वाढत गेला आणि सिंधुदेशाच्या मागणीला पुन्हा जोर मिळत गेला.

सिंधुदेश चळवळीचा इतिहास: मुस्लिमही होते समर्थक

1970 च्या दशकात GM सैयद यांच्या नेतृत्वाखाली सिंधुदेशाची मागणी जोर धरु लागली. सैयद मुस्लिम होते आणि मुस्लिम लीगशी संबंधितही होते. त्यांचे मत होते की पाकिस्तान तयार झाल्यानंतर सिंध्यांचे राजकीय हक्क कमी झाले.

सरकारने चळवळ दडपण्यासाठी सिंधमध्ये मोठ्या प्रमाणात उर्दूभाषिकांना स्थलांतरित केले, ज्याचा फटका सर्वात जास्त सिंधी हिंदूंना बसला. त्यांच्यावर ओळख आणि भाषिक कारणांमुळे हिंसा वाढली आणि चळवळ हळूहळू हिंदू सिंध्यांच्या बाजूला सरकली.

कुठले प्रदेश ‘सिंधुदेश’मध्ये येतात?

सिंधुदेशच्या मागणीतील प्रदेश —
कराची, हैदराबाद, लरकाना, मीरपूर खास, सक्खर, रोहडी, बदीन, थट्टा, उमरकोट, खैरपूर इत्यादी. या चळवळीचा लाल-निळा झेंडा आहे, ज्यातील निळा रंग सिंधू नदीचे प्रतीक मानला जातो.

अल्पसंख्याक हिंदूंचे प्रश्न गंभीर

सिंधमध्ये हिंदूंची संख्या फक्त 7% उरली आहे. तेही असुरक्षित…

  • अल्पवयीन मुलींचे अपहरण आणि जबरदस्ती धर्मांतर

  • जमिनी बळकावणे

  • पोलीस आणि न्यायालयीन पातळीवरही अन्याय

या घटनांमुळे हिंदू सिंध्यांमध्ये भीती आणि निराशा वाढली आहे.

भारतात येण्याची इच्छा पण...

काही राष्ट्रवादी गटांचे मत आहे की सिंध भारताशी संस्कृतीने अत्यंत जवळचा आहे. ते मानतात की पाकिस्तान त्यांचे मुद्दे ऐकत नसल्यास भारत ऐकेल. परंतु ही अधिकृत राजकीय मागणी नाही. भारतही कधीही सिंधुदेशाच्या मागणीचे खुलेपणाने समर्थन करत नाही. हे पूर्णपणे परराष्ट्रसंबंधांचे प्रकरण असून पाकिस्तान यास आपल्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप म्हणून पाहील. म्हणूनच बलुचिस्तानसारख्या मागण्यांना भारताने अधिकृत प्रतिसाद दिला नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT