Tarique Rahman on India Relations
ढाका : 'बांगलादेश प्रथम' या अजेंड्यावर बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीला (BNP) अभूतपूर्व विजय मिळवून दिल्यानंतर देशाचे भावी पंतप्रधान तारिक रहमान यांनी भारतासोबतच्या भविष्यातील संबंधांबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
निवडणुकीतील निर्णायक विजयानंतर शनिवारी देशाला उद्देशून केलेल्या पहिल्याच भाषणात रहमान यांनी स्पष्ट केले की, भारतासोबतचे परराष्ट्र धोरण हे केवळ बांगलादेशच्या "हितावर" आधारित असेल. बांगलादेशचे पुढचे पंतप्रधान म्हणून शपथ घेण्याची शक्यता असलेल्या रहमान यांनी सांगितले की, "बांगलादेश आणि येथील जनतेचे हित हेच आमचे परराष्ट्र धोरण निश्चित करेल." त्यांचे हे विधान 'बीएनपी'च्या त्या जुन्या भूमिकेशी सुसंगत आहे, ज्यामध्ये त्यांनी भारत, चीन आणि पाकिस्तान यांसारख्या प्रादेशिक सत्तांशी संतुलित संबंध राखण्याचे आणि कोणत्याही देशाला आपला मालक न मानण्याचे संकेत दिले होते.
काही आठवड्यांपूर्वीच १७ वर्षांच्या वनवासानंतर बांगलादेशचे माजी अध्यक्ष झियाउर रहमान यांचे पुत्र असलेले तारिक मायदेशी परतले होते. विद्यार्थ्यांच्या उठावानंतर शेख हसीना यांची सत्ता उलथवून लावल्यानंतर देशात निवडणूक झाली. बांगलादेश संसदेच्या २९७ जागांपैकी तब्बल २१२ जागांवर तारिक रहमान यांच्या बीएनपीने विजय मिळवला आहे. २००८ पासून लंडनमध्ये वास्तव्यास होते. शेख हसीना यांच्या कार्यकाळात त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप झाले. २००४ च्या प्रसिद्ध ग्रेनेड हल्ला प्रकरणात त्यांना शिक्षाही सुनावण्यात आली होती. २००१-२००६ या त्यांच्या सत्तेच्या काळात झालेल्या आर्थिक गैरव्यवहारामुळे प्रसारमाध्यमांनी त्यांना 'डार्क प्रिन्स' हे नाव दिले होते. तथापि, गेल्या वर्षभरात बांगलादेशच्या न्यायालयांनी त्यांची सर्व प्रमुख गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता केली होती.