स्वतंत्र भारतातील पहिली सार्वत्रिक निवडणूक 25 ऑक्टोबर 1951 ते 21 फेब्रुवारी 1952 या काळात पार पडली. हे एक अतिशय मोठे आयोजन होते ज्यामध्ये जगातील लोकसंख्येचा सुमारे 17 टक्के हिस्सा मतदान करणार होता. ही त्या काळातील सर्वात मोठी निवडणूक होती. निवडणुकीत सुमारे 1874 उमेदवार आणि 53 राजकीय पक्ष उतरले होते. त्यामध्ये 14 राजकीय पक्ष होते. या पक्षांनी 489 जागांवर निवडणूक लढवली. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने 364 जागांवर विजय मिळवला. एकूण 16 जागा जिंकणारी भारतीय कम्युनिस्ट पार्टी मुख्य विरोधी पक्ष बनली होती. पं. जवाहरलाल नेहरू हे स्वतंत्र भारतातील लोकतांत्रिक पद्धतीने निवडलेले पहिले पंतप्रधान ठरले.
पहिल्या निवडणुकीत वापरण्यात आलेल्या 35 लाख मतपेट्या सुरक्षित ठेवण्यात आल्या होत्या. त्यामुळे दुसर्या निवडणुकीत केवळ पाच लाख अतिरिक्त मतपेट्यांचीच गरज भासली. मुख्य निवडणूक आयुक्त सुकुमार सेन यांच्या दूरदर्शीपणाने पहिल्या निवडणुकीच्या तुलनेत दुसर्या निवडणुकीवेळी 4.5 कोटी रुपयांची बचत झाली. देशात पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीवेळी 17 कोटी 32 लाखांहून अधिक मतदार होते, तर दुसर्या निवडणुकीपर्यंत ही संख्या वाढून 19 कोटी 30 लाखांवर जाऊन पोहोचली. या निवडणुकीत सुमारे 50 टक्के मतदान झाले. एकूण 197 टन कागद वापरला गेला. निवडणुकीच्या दिवशी दारूची दुकाने बंद ठेवण्याची पद्धत त्यावेळेपासूनच आहे!
सुकुमार सेन हे देशाचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त होते. त्यांनी 21 मार्च 1950 ते 19 डिसेंबर 1958 या काळात हा पदभार सांभाळला. देशातील पहिल्या दोन सार्वत्रिक निवडणुका त्यांच्याच कुशल कार्यकाळात यशस्वीपणे पार पडल्या. यापैकी पहिली निवडणूक 1951-52 मध्ये तर दुसरी 1957 मध्ये झाली. विशेष म्हणजे सुकुमार सेन यांनी भारताबाहेरही अशीच जबाबदारी सांभाळली होती. त्यांनी सुदानमध्ये 1953 मध्ये तेथील पहिले मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून जबाबदारी सांभाळली!
1971 सालचे पाकिस्तानविरुद्ध जिंकलेले युद्ध आणि स्वतंत्र बांगलादेशाची निर्मिती हा भारताच्या इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. 16 डिसेंबर 1971 रोजी दुपारी साडेचार वाजता जनरल ए. ए. के. नियाझी यांच्या नेतृत्वाखालील पूर्व बंगालमधील पाकिस्तानी फौजांनी भारताचे लेफ्टनंट जनरल जगजितसिंग अरोरा यांच्यापुढे ढाका येथे शरणागती पत्करली. 16 डिसेंबर रोजी सकाळपासूनच संसद या शरणागतीच्या बातमीची प्रतीक्षा करीत होती. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी स्वीडिश दूरचित्रवाणीला मुलाखत देत असतानाच कमांडर इन चीफ एस.एच.एफ.जे. माणेकशॉ यांनी फोन करून त्यांना पाकिस्तानच्या शरणागतीची माहिती दिली. त्यावेळी मुलाखत अर्धवट सोडून इंदिरा गांधी लोकसभेत आल्या. पाकिस्तानी फौजा शरण आल्या असून, ढाक्का ही स्वतंत्र देशाची राजधानी बनली असल्याची घोषणा त्यांनी केली. शेख मुजिबूर रहमान यांच्या सोनार बांगलाला त्यांनी शुभेच्छा दिल्या!
हेही वाचा :