कर्जत : पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील बाबुळगावला स्मशानभूमी नाही. यामुळे 'इथं मरणानंतर ही मरण यातना संपेनात' अशीच घटना या गावात घडली आहे. आज भर पावसामध्येच रस्त्यावर अंत्यविधी करण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे. 'कोणी स्मशानभूमी देता का?' असे म्हणन्याची वेळ नागरिकांवर आली आहे. ग्रामपंचायतीची गायरान जमीन ज्या परिसरामध्ये आहे, तिचे वाटप अन्य नागरिकांना झाल्यामुळे तेही त्या परिसरामध्ये नागरिकांसाठी स्मशानभूमी होऊ देत नाहीत. यामुळे गावामध्ये प्रत्येकवेळी अंत्यविधी कोठे करायचा असा गंभीर प्रश्न निर्माण होतो. ज्या नागरिकांना स्वतःची शेतजमीन आहे, ते त्या परिसरामध्ये स्व:मालकीच्या जमिनीत अंत्यविधी करत आहेत.
मात्र, गावातील अन्य गोरगरीब नागरिकांना मात्र स्मशानभूमी अभावी चांगलेच हाल होत आहेत. मरणानंतर देखीलही या गावातील नागरिकांच्या मरण यातना संपत नसल्याचे दुर्दैवी चित्र पाहावयास मिळत आहे. एका व्यक्तीचे निधन झाल्याने आज अशाच पद्धतीने त्यावर अंत्यविधी करण्याची वेळ आली. गावामध्ये स्मशानभूमी नसल्यामुळे अंत्यविधी कोठे करावयाचा असा प्रश्न निर्माण झाला. अखेर भर पावसामध्ये रस्त्यावर उघड्यावर मिळेल त्या जागेमध्ये अंत्यविधी करण्याचा दुर्दैवी प्रसंग नागरिकांवर ओढवला.
स्मशानभूमी नसलेले गाव
कर्जत तालुक्यातील बाबुळगाव खालसा येथे स्मशानभूमी नाही. गावांमध्ये स्मशानभूमी बांधण्यासाठी जागा शिल्लक नाही. आणि नागरिक खासगी जागा देण्यास तयार नाहीत. यामुळे हे गाव स्मशानभूमी नसलेले गाव आहे.
हेही वाचा :