दिनेश गुप्ता
पुणे : कोरडवाहू व दुष्काळी विभाग म्हणून मराठवाड्याची ओळख आहे. मात्र, आता ही ओळख गावाबरोबरच राज्याला समृद्ध करणारी ठरणार आहे. देशातील सर्वांत लांबीची व गोडव्याची चिंच लातूर जिल्ह्यातील पानचिंचोली येथे आहे. या चिंचेचे पेटंट मिळवण्यासाठी शास्त्रज्ञ गणेश हिंगमिरे यांनी केंद्राकडे प्रस्ताव दाखल करून लातूरच्या 'पठडी चिंच'ची ओळख देशाला करून दिली आहे.
लातूर जिल्ह्यातील पानचिंचोली गावात एक ते दीड फूट लांबीची 'मधाळ चिंच' उत्पादित होते. हिंगमिरे यांनी केलेल्या पानचिंचोली येथील भौगोलिक परिस्थितीच्या अभ्यासात असे समोर आले की, भारतात उत्पादित होणार्या चिंचेपेक्षा रसाळ व आरोग्यदायी चिंच मराठवाड्यात मिळते. एकट्या महाराष्ट्रात 5 हजार कोटींचे चिंच उत्पादन होते. मात्र, वृक्षतोड व लक्ष न दिल्यामुळे हे उत्पादन 30 टक्के म्हणजेच 1500 कोटींपेक्षा जास्त कमी झाले आहे.
महाबळेश्वरला स्ट्रॉबेरी, तर नाशिकला द्राक्षांचा हब ओळख मिळाली. तशीच ओळख दुर्गम भागातील या उत्पादनांना मिळावी यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले. त्यांच्या प्रयत्नांना यश आल्यानंतर लातूरचे जिल्हाधिकारी व कृषी अधिकारी यांच्या मदतीने पेटंटसाठी प्रस्ताव दाखल केला. या पेटंटसह हिंगमिरे यांनी त्या गावातील पान, बोरसरीची डाळ आणि काकती कोथिंबीर यांचेही प्रस्ताव पेटंटसाठी दाखल केले आहेत.
मागील दोन वर्षांपासून सुरू असलेल्या संशोधनात कृषी अधिकार्यांनी परिश्रम घेतले आहेत. चिंचेबरोबरच आणखी तीन पेटंटचे प्रस्ताव दाखल झाले आहेत. लातूरच्या सर्वांत लांब चिंचेमुळे पानचिंचोलीचे नाव जगभरात घेतले जाईल.
– गणेश हिंगमिरे, शास्त्रज्ञ