Latest

काकी ये दीदी, रसमत करजो होळी, बंजारा समाजाचा अनोखा होळी उत्सव

दिनेश चोरगे

बीड; पुढारी वृत्तसेवा : हिंदू संस्कृतीमध्ये होळी, धुलिवंदन सण उत्साहात साजरे केले जातात. बंजारा समाजामध्ये या सणाला अनन्यसाधारण महत्व आहे. एक महिन्यापासून या समाजातील महिला व पुरूष या सणाची जय्यत तयारी करीत असतात. धुलिवंदन साजरा करण्यासाठी बंजारा समाजामध्ये एक वेगळी प्रथा आहे. शेकडो वर्षांपासून ही प्रथा आजतागायत सुरूच आहे.

काकी ये दादी, रसमत करजो होळी, बोलच ये भांड… आजी काकी तुम्ही रागवू नका, होळी आम्हाला भांडायला सांगते असा याचा अर्थ होतो. त्याप्रमाणे बंजारा समाजामध्ये होळी, दिवाळी व नागपंचमीला घरच्या पित्तरांना मनोभावे पूजले जाते. होळी निमित्त पहाटे वळवट व भात करून शुद्ध तुपामध्ये अग्नीमध्ये देऊन पूजन करतात त्यास आपकार असे म्हणतात. याचा अर्थ चुलीमध्ये अग्नीला घास देणे, असा होतो. बंजारा समाजामध्ये होळीला एक विशेष असं महत्त्व दिले जाते. समाजात होळी सण पंधरा दिवस अगोदरच साजरा केला जात असतो त्याची लगबग दिसून येत असते. तांड्यामध्ये पुरुष व स्त्रिया होळी खेळायला सुरुवात करतात. बजारा समाजात होळीनिमित्त गावच्या वाटेवर अथवा इतर गावांमध्ये जाऊन गेर मागणे ही प्रथा आहे. गेर मागणे म्हणजेच पैसे मागणे. ही प्रथा हळूहळू लोप पावत चालली आहे. याबरोबरच गावामध्ये नवीन मुलगा जन्माला आल्यास त्याचा शोध घेतात त्याला धुंड असं म्हणतात. अशा मुलाचे घर शोधून त्याच्या घरासमोर जाऊन गाणे म्हणत आनंदोत्सवात होळी साजरी करण्याचीही प्रथा बंजारा समाजात आहे.

तसेच मागील वर्षाच्या काळात समाजात कोणी मरण पावले असेल तर त्या घरासमोर जाऊन गाणे म्हणत होळी खेळतात जेणेकरून त्या घरच्या माणसांचं एक प्रकारे सांत्वन व्हावं, अशा पद्धतीने बंजारा समाजात होळी साजरी केली जाते. गावोगावी होळी सायंकाळी सात वाजता पेटवली जाते. पण बंजारा समाजामध्ये होळी सकाळी चार वाजता पेटवली जाते या समाजामध्ये सकाळच्या शुक्राची चांदणी निघते. त्या वेळी होळी जाळली जाते.

विशेष म्हणजे गावातील पेटविलेल्या होळीचा विस्तव घेऊन मुले रात्री घरी जातात व त्या विस्तवाने चार वाजता होळी पेटवली जाते.
सार्वजनिक ठिकाणी एरंडीच्या झाडाला आग लागली जाते यावेळी महिला मुलांना आग लागू देत नाहीत. त्यामुळे एरंडाची दांडी घेऊन पळतात त्यास दांडी काढणे म्हणतात. होळीच्या आजूबाजूला बायका मुली होळी खेळत 'होळी आई होळी डगर चालिये' या गाण्याने होळीच्या सणांची सांगता होते. ज्याप्रमाणे गणपती उत्सवाला निरोप देतात. त्याचप्रमाणे होळी झाल्यानंतर अखेरचे गाणं म्हणतात असं विविधतेने नटलेल्या बंजारा समाजाची होळी हा अत्यंत जिव्हाळ्याचा सण मानला जातो.

अनेक वर्षांपासून रूढी परंपरा नुसार चालत आलेला सण आज देखील बंजारा समाज गुण्यागोविंदाने एकत्र येत गाणे म्हणत साजरा करत असतो. बंजारा समाजामध्ये या होलिकोत्सवाकरीता महिला वेगवेगळे गीत सादर करतात. गाण्यामधून परंपरा चालत आलेल्या रितीरिवाजाची जपवणूक करण्याबरोबरच सामाजिक सलोखा ठेवण्याचा संदेश दिला जातो.
– विष्णू आडे ,सहशिक्षक

             हेही वाचलंत का ?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT