मुंबई ; पुढारी ऑनलाईन : मागच्या दोन दिवसांपासुन राज्याचे हिवाळी अधिवेशन सुरू या अधिवेशनात विरोधकांकडून विविध प्रश्न विचारले जात आहेत. दरम्यान महात्मा ज्योतीबा फुले कर्जमाफी योजनेतंर्गत नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या सानुग्रहाबाबत कोल्हापूरचे आमदार प्रकाश अबिटकर यांनी हा प्रश्न उपस्थित केला. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी सरकारने ही घोषणा केली आहे यावर आम्ही कधीही पळ काढणार नाही असे म्हणाले. (ajit pawar)
पवार पुढे म्हणाले की, महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजनेतंर्गत नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदान आम्ही देणार आहे. महाविकास आघाडी सरकार या घोषणेपासून कदापी पळ काढणार नाही अशी स्पष्ट ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभागृहात दिली. अबिटकर यांच्या तारांकीत प्रश्नाला त्यांनी सडेतोड उत्तर दिले.
मागच्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे राज्यातील आणि देशातील आर्थिक उत्पन्न कमी झाले आहे. राज्याला लॉकडाऊनमुळे कमाल दिड लाख कोटींचे नुकसान झाले आहे. राज्याच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा होत आहे. उर्वरित शेतकऱ्यांना याचा लवकरच लाभ मिळणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.
तसेच कर्ज वेळेत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना तीन लाखापर्यंतचे पिक कर्ज शून्य टक्के व्याज दराने देणारे एकमेव राज्य असल्याचेही ते म्हणाले.
प्रश्नोत्तराच्या तासामध्ये आमदार आबिटकर यांनी याबाबतीत तारांकीत प्रश्न उपस्थित केला होता. यावर अजित पवार यांनी शेतकऱ्यांना दिलासा देणारी घोषणा केली. ठाकरे सरकार स्थापन झाल्यानंतर शेतकर्यांना कर्जमाफी देण्यासाठी तीन निर्णय घेतले होते.
दोन लाखांपर्यंत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी तर दोन लाखांच्यावर कर्ज असणाऱ्यांनी वरच्या कर्जाची परतफेड केल्यास त्यांनाही दोन लाखांची माफी आणि ज्यांनी कर्जाची वेळेत परतफेड केली अशा शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता.
दरम्यान, या योजनेतंर्गत ३१ लाख ८१ हजार शेतकऱ्यांना पात्र ठरवत २० हजार २९० कोटींचे वाटप करण्यात आले आहे. काही शेतकर्यांना पुरवणी मागण्यात तरतूद केल्याप्रमाणे मदत मिळेल. तर उर्वरित सर्व शेतकऱ्यांना पुढील अर्थसंकल्पात मदत जाहीर करु अशी घोषणाही अजितदादा पवार यांनी यावेळी केली.