पणजी : पुढारी वृत्तसेवा
पणजी महापालिकेच्या निवडणुकीत महापालिकेवर ३० पैकी २७नगरसेवक निवडून आणलेल्या टुगेदर फॉर प्रोग्रेसिव्ह पणजी पॅनलचा महापौर कोण होणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. ज्येष्ठ नगरसेवक बेंतो लॉर्ना, माजी महापौर उदय मडकईकर किंवा पुन्हा विद्यमान महापौर रोहित मोन्सेरात यांनी महापौरपदाची संधी मिळेल, अशी चर्चा आहे. पॅनलचे सर्वेसर्वा महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात हेच महापौर व उपमहापौर ठरविणार असल्याने त्यांच्या भूमिकेकडे लक्ष लागून राहिले आहे.
पणजी महापालिकेवर मोन्सेरात यांच्या पॅनलने तब्बल २५ वर्षे सत्ता राखली आहे. काहीकाळ वगळता त्यांच्याच मर्जीचा नगरसेवक महापौर बनलेला आहे. त्यामुळे बाबूश मोन्सेरात यावेळी कुणाला महापौरपदी बसवतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
या पॅनलला भारतीय जनता पक्षाने पाठिंबा दिला होता. त्यामुळे हा विजय भाजपचा असल्याचे बाबूश यांनी म्हटले असले, तरी बाबूश यांच्यावरच महापौर निवडण्याची जबाबदारी भाजपचे नेते सोपवतील असे दिसते प्रभाग चारमधून पुन्हा निवडून आलेले विद्यमान महापौर रोहित मोन्सेरात यांच्यासोबतच प्रभाग सहामधून निवडून आलेले ज्येष्ठ नगरसेवक बेंतो लोरेना व माजी महापौर उदय मडकईकर यां तिघांची नावे सध्या महापौर पदासाठी चर्चेत आहेत.
आम्ही पणजीकर पॅनलचे प्रमुख उत्पल पर्रीकर यांनी घराणेशाहीचा मुद्दा महापालिका प्रचारात वारंवार उपस्थित केला होता. विधानसभा निवडणूक १० महिन्यांवर आहे. रोहित मोन्सेरात यांना यावेळी ताळगावमधून विधानसभेवर पाठवण्याचा बाबूश यांचा विचार आहे.
या पार्श्वभूमीवर लोर्ना किंवा मडकईकर यांच्यापैकी एकाला महापौर पद दिले जाण्याची शक्यता असून उपमहापौरपदी पाच वर्षे ज्येष्ठ महिला नगरसेवकांना प्रत्येकी एक वर्ष संधी दिली जाण्याची शक्यता आहे.
धक्का तंत्र अवलंबणारे बाबूश मंत्री बाबूश
मोन्सेरात हे इतर राजकीय नेत्यांप्रमाणे सरळ वाटेने न जाणारे, प्रसिद्धीपासून दूर राहणारे नेते आहेत. अनेकवेळा त्यांनी लोकांचा अंदाज फोल ठरवत धकादायक निर्णय घेतले आहेत. त्यामुळे महापौर निवड करतानाही ते धक्कातंत्र अवलंबू शकतात. वरील तीन नावांशिवाय अन्य एखाद्या नगरसेवकालाही ते महापौर बनवू शकतात, अशीही चर्चा सुरू आहे.
भाजपचे बळ वाढले
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक हे पूर्वी २०२७मध्ये भाजप २७ जागा जिंकणार असे म्हणत होते. मात्र, महापालिका निवडणुकीनंतर त्यांनी २०२७ मध्ये ३० जागा जिंकण्याचा दावा केला. कारण जिल्हा पंचायत निवडणुकीनंतर महापालिका निवडणुकीतही विरोधक एकत्र येऊनही भाजपला दोन्ही निवडणुकांमध्ये भरीव यश मिळाले आहे. त्यामुळे लोक भाजप व सरकारवर टीका करणाऱ्यांपेक्षा भाजपला मते देणाऱ्यांची संख्या जास्त आहे, याची जाणीव भाजप नेत्यांना झाली आहे. त्यामुळेच विधानसभा निवडणुकीत ३० जागा जिंकण्याचा विश्वास व्यक्त करत आहेत.