वाळपई : पुढारी वृत्तसेवा
गेल्या चार दिवसांपासून झालेल्या दमदार पावसामुळे सत्तरी तालुक्यातील म्हादई नदीच्या पाण्याच्या प्रवाहात मोठी वाढ झाली असून त्यामुळे बंद पडण्याच्या मार्गावर आलेल्या व्हाईट वॉटर राफ्टिंग उपक्रमाला पुन्हा एकदा नवसंजीवनी मिळाली आहे. आठ दिवस पावसाने दडी मारल्यामुळे नदीतील पाण्याची पातळी घटली होती आणि साहसी पर्यटनाचा हा महत्त्वाचा उपक्रम ठप्प होण्याची वेळ आली होती.
मात्र घाटमाथ्यावर झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी पुन्हा खळाळून वाहू लागली असून उस्ते येथून व्हाईट वॉटर राफ्टिंगला पुन्हा दमदार सुरुवात झाली आहे. राष्ट्रीय तसेच स्थानिक स्तरावरील पर्यटकांकडून या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
सत्तरी तालुक्यातील नगरगाव पंचायत क्षेत्रातील उस्ते ते सावर्डे या सुमारे १२ किलोमीटर लांबीच्या नदीमार्गावर व्हाईट वॉटर राफ्टिंगचा आनंद पर्यटकांना घेता येतो. वेगवान प्रवाह, खळाळते पाणी, नैसर्गिक वळणे, लहान-मोठे प्रवाह आणि दुतर्फा पसरलेले घनदाट जंगल यामुळे हा प्रवास पर्यटकांसाठी आयुष्यभर लक्षात राहणारा अनुभव ठरतो.
सत्तरीतील व्हाईट वॉटर राफ्टिंग प्रकल्पाची संकल्पना तत्कालीन मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांच्या कार्यकाळात प्रत्यक्षात आली. कर्नाटकातील दांडELI येथील राफ्टिंगला मिळणारा प्रतिसाद लक्षात घेऊन गोव्यातही अशा प्रकारचे साहसी पर्यटन विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला.
तज्ज्ञांकडून म्हादई नदीचे सर्वेक्षण करून उस्ते ते सावर्डे हा मार्ग राफ्टिंगसाठी योग्य असल्याचे निश्चित करण्यात आले. त्यानंतर या प्रकल्पाची सुरुवात झाली. साहसी पर्यटनावर अवलंबून असलेल्या स्थानिक व्यावसायिक, प्रशिक्षित राफ्टिंग मार्गदर्शक, वाहनचालक, खाद्यपदार्थ विक्रेते आणि इतर संबंधित घटकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते.
अनेक पर्यटकांनी बुकिंग पुढे ढकलले होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून घाटमाथ्यावर झालेल्या मुसळधार पावसामुळे म्हादई नदीच्या पाण्याच्या वेग वाढला असून नदीचे पात्र पुन्हा खळाळून वाहू लागले आहे. आवश्यक जलपातळी उपलब्ध झाल्यानंतर राफ्टिंगला हिरवा कंदील देण्यात आला आहे.
प्रशासनाने पर्यटकांना सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे. प्रशिक्षकांच्या सूचनांचे पालन करणे, लाईफ जॅकेट आणि हेल्मेटचा वापर अनिवार्य ठेवणे, मद्याप्राशन करून राफ्टिंगमध्ये सहभागी न होणे तसेच नदी परिसरात स्वच्छता राखणे, प्लास्टिकचा वापर टाळणे आणि निसर्ग संवर्धनात सहकार्य करणे आवश्यक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.