पणजी : पणजी : आगामी २०२७ विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांच्या आघाडीबाबत सुरू असलेल्या चर्चांवर गोवा फॉरवर्ड पक्षाने कठोर भूमिका घेतली आहे. पक्षाचे अध्यक्ष आणि आमदार विजय सरदेसाई यांनी काँग्रेसवर थेट निशाणा साधत, गोव्यातील जनतेला काँग्रेसने दोन वेळा फसवले असून आता तिसऱ्यांदा तसे होऊ नये, अशी भावना जनतेत असल्याचा दावा केला.
विजय सरदेसाई म्हणाले की, आघाडीच्या बैठकीसाठी निमंत्रण देणे किंवा स्वीकारणे हा मुख्य मुद्दा नाही. खरा मुद्दा म्हणजे गोव्याच्या जनतेचा काँग्रेसवरील कमी झालेला विश्वास आहे. काँग्रेसने यापूर्वी दोनदा जनतेची आणि सहयोगी पक्षांची निराशा केली असून पुन्हा तशी परिस्थिती निर्माण होऊ नये, अशी अपेक्षा लोक व्यक्त करत आहेत.
सरदेसाई यांनी स्पष्ट केले की, या परिस्थितीत गोवा फॉरवर्ड पक्ष जनतेच्या प्रश्नांसाठी स्वबळावर रस्त्यावर उतरेल आणि सरकारविरोधातील आंदोलन अधिक तीव्र करेल. पक्ष कोणत्याही राजकीय अनिश्चिततेत अडकून न पडता जनतेच्या हितासाठी स्वतंत्रपणे लढा देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यापूर्वी गोवा फॉरवर्डने काँग्रेससोबतच्या युतीच्या चर्चांना तात्पुरती स्थगिती देत, आगामी निवडणुकांसाठी संघटना मजबूत करण्यावर भर देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. राज्यातील सर्व ४० विधानसभा मतदारसंघांमध्ये पक्षाची संघटना विस्तारण्यासाठी जिल्हास्तरीय बैठका आणि तळागाळातील कार्यकर्त्यांचे जाळे मजबूत करण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे.
सरदेसाई यांच्या या वक्तव्यामुळे गोव्यातील विरोधी पक्षांच्या संभाव्य महाआघाडीबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आगामी विधानसभा निवडणुकांपूर्वी राज्यातील राजकीय समीकरणे आणखी बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.