पणजी : पुढारी वृत्तसेवा
रेल्वेच्या दुपदरीकरणाविरोधात व्हेळसांव येथील आंदोलनात गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष आमदार विजय सरदेसाई आणि काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी सहभाग घेतला होता. त्यावेळी त्यांनी काँग्रेस पक्षाने या आंदोलनात भाग न घेतल्याबद्दल काँग्रेसवर टीका केली.
प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी युतीची बोलणी करण्यासाठी रिव्होल्यूशनरी गोवन्स (आरजी) पक्षाचे आमदार वीरीश बोरकर यांना फोन केला. मात्र सरदेसाई यांना फोन केला नाही. त्यामुळे सरदेसाई नाराज झाले आहेत. तर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे हे १७ रोजी गोव्यात येत आहेत.
मात्र त्याबाबत आपणास काहीच कळवले नाही, असे सांगत पाटकर यांनीही काँग्रेसवर टीका केली आहे. त्यामुळे २०२७ च्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप-काँग्रेसविरोधी तिसऱ्या आघाडीची शक्यता वर्तवली जात आहे.
सरदेसाई म्हणाले की, गोवा फॉरवर्ड पक्ष काँग्रेसचा मित्रपक्ष राहिला आहे. परंतु युतीचे भवितव्य चर्चेतूनच ठरवावे लागेल. यातून २०२७ च्या विधानसभा निवडणुकांपूर्वी काँग्रेसच्या भूमिकेबद्दल वाढत्या असंतोषाचे संकेत मिळतात.
युती टिकवण्यासाठी जे काही करणे आवश्यक आहे, त्यावर आपण एकत्र बसून चर्चा केल्यावरच काही होऊ शकते. काँग्रेसने आघाडीसाठी आरजीसोबत संपर्क साधला. परंतु गोवा फॉरवर्डकडे असा कोणताही प्रस्ताव ठेवलेला नाही, असेही त्यांनी नमूद केले. या सर्व घडामोडी पाहता तिसरी आघाडी स्थापन होण्याचे संकेत मिळत आहेत.
काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी, काँग्रेसने आपल्याला बाजूला ठेवल्याबद्दल नाराजी व्यक्त करत सांगितले की, मला याचे दुःख होते. कारण गेल्या चार वर्षांपासून मी माझा वेळ, पक्षाची संघटनात्मक जबाबदारी, माझी ऊर्जा, सर्व काही पक्षाला दिले.
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष संघटनात्मक बाबींसाठी येत असतील आणि ज्येष्ठ सदस्यांना विश्वासात घेतले जात नसेल, तर २०२७ मध्ये भाजपविरुद्ध लढण्याबाबत काँग्रेस गंभीर आहे की नाही, असा प्रश्न निर्माण होतो.
चर्चेसाठी एकत्र बसण्याबाबत सध्या तरी कोणतेही संकेत नाहीत. मी कोणत्याही चर्चेसाठी वचनबद्ध नाही. आघाडीवर चर्चा करण्यासाठी काँग्रेसकडून जर आम्हाला पत्र वगैरे पाठवले असेल आणि ते दुसऱ्या कोणाकडे पोहोचले असेल, तर मला माहित नाही. मल्लिकार्जुन खर्गे यांच्या गोवा दौऱ्याचा गोवा फॉरवर्ड पक्षावर कोणताही परिणाम होणार नाही, असे असे सरदेसाई यांनी स्पष्ट केले.