पणजी : पुढारी वृत्तसेवा
कर्नाटकातून होणारा पुरवठा कमी झाल्याने आणि राज्यात मागणी वाढल्याने भाज्यांच्या दरात वाढ झाली आहे. हा तुटवडा कायम राहिल्यास भाव आणखी वाढू शकतात, असे पणजीतील विक्रेत्यांनी सांगितले.
वालपापडी ८० रुपयांवरून १२० ते १६० रुपये प्रति किलो दराने विकली जात आहे, तर आल्याचे भाव १६० रुपयांवरून ३०० ते ३२० रुपये प्रति किलोपर्यंत झाले आहेत. काकडीचा भाव ४० रुपयांवरून ६० रुपये प्रति किलो झाला आहे, तर कोथिंबीर आता २० रुपयांऐवजी ३० ते ४० रुपये प्रति जुडी दराने विकली जात आहे.
लसूण आकारानुसार, २५० ग्रॅमची किंमत ८० ते १०० रुपयांच्या दरम्यान आहे. फलोत्पादनाकडे मात्र भाज्यांचे दर स्थिर आहेत. बाजारात कांदा, बटाटा, टोमॅटो यांचा दर प्रतिकिलो ४० रुपये, तर फलोत्पादनाकडे अनुक्रमे ३४, २६, २५ असा दर आहे. कर्नाटकात कमी पाऊस पडल्याने भाज्यांचे उत्पादन घटल्याने दरात वाढ झाल्याचे पणजीतील एका व्यापाऱ्याने सांगितले.
गोवा शेजारच्या राज्यावर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे, त्यामुळे जेव्हाही उत्पादन घटते तेव्हा गोव्यातील भाज्यांचे वाढतात. सध्याच्या हवामानाच्या परिस्थितीमुळे लागवडीवर परिणाम झाला आहे आणि भाव वाढले आहेत, असेही त्यांनी सांगितले. भाववाढीमुळे मोठ्या प्रमाणावर केलेल्या ऑर्डरवर परिणाम झाला असून व्यापाऱ्यांचा नफा कमी झाला आहे.
पूर्वी आम्हाला घाऊक बाजारात चांगले दर मिळायचे, पण भाववाढीमुळे नफा खूप कमी झाला आहे, त्यामुळे आम्ही मोठ्या प्रमाणावर ऑर्डर घेत नाही, असे दुसऱ्या एका घाऊक भाजी खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्याने सांगितले. तथापि, गावठी व रानभाज्या मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होत असून ग्राहक त्यांना पसंती दर्शवित आहेत.