पणजी : पुढारी वृत्तसेवा
नवीनतम एयरबीएनबीच्या अभ्यासातील आकडेवारीनुसार, गोव्याने भारतातील वर्षभर सर्वाधिक मागणी असलेल्या पर्यटनस्थळांपैकी एक म्हणून आपले स्थान अधिक मजबूत केले आहे. पावसाळ्याच्या हंगामात पर्यटकांची वाढती पसंती असलेल्या प्रमुख ठिकाणांमध्ये गोव्याचा समावेश झाला आहे.
मान्सून प्रवासासाठीच्या देशांतर्गत शोधांमध्ये वर्षभरात जवळपास ४० टक्के वाढ झाली असून, तीन ते पाच दिवसांच्या छोट्या सहली अर्थात 'मायक्रो-व्हॅकेशन'च्या वाढत्या प्रवाहाचा लाभ घेणाऱ्या प्रमुख ठिकाणांमध्ये गोव्याचा समावेश असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
पर्यटकांच्या बदलत्या प्रवृत्तीवरही या अहवालातून प्रकाश पडला आहे.
भारतीय पर्यटक उत्स्फूर्त सप्ताहाअखेरच्या सहली तसेच तीन ते पाच दिवसांच्या छोट्या सुट्ट्यांना वाढती पसंती देत आहेत. हिरवीगार नैसर्गिक दृश्ये, स्थानिक संस्कृती आणि पावसाळ्यातील निवांत अनुभव देणाऱ्या पर्यटनस्थळांना मागणी वाढत आहे.
गोव्याच्या अंतर्गत प्रदेशासह संस्कृती, खाद्यसंस्कृती, आरोग्यविषयक सुविधा आणि समुदायाधारित अनुभव पर्यटकांनी शोधावेत, यासाठी पर्यटन धोरणाच्या माध्यमातून प्रोत्साहन दिले जात आहे. पुनरुत्पादक आणि वर्षभर चालणाऱ्या पर्यटनाला चालना देण्यावर भर आहे. पावसाळ्यातील छोट्या सुट्ट्यांची वाढती लोकप्रियता या दृष्टिकोनाशी पूर्णपणे जुळणारी असून, गोव्याच्या विविध पैलूंचा शोध घेणारे दर्जेदार पर्यटक स्थानिक लोकांच्या उपजीविकेलाही हातभार लावतील, असे पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांनी सांगितले.