पेडणे, पुढारी वृत्तसेवा : वळपे-विर्नोडा येथे राष्ट्रीय महामार्ग 66 येथील देवाच्या घुमटीवरून गुरुवारी (दि.25) तणाव निर्माण झाला होता. वाहनाने या घुमटीला ठोकर दिल्याने ती घुमटी उद्ध्वस्त झाली. मात्र त्यांनी दुसर्या दिवशी म्हणजे गुरुवारी ती घुमटी बांधण्याचे काम हाती घेतले. मात्र ती बांधून झाल्यानंतर कंत्राटदार काँक्रेटच्या गाड्या घेऊन त्या ठिकाणी रस्ता करण्यासाठी आला आणि बांधण्यात आणलेली घुमटी त्याने मोडून टाकली. ही माहिती मिळताच तिथे नागरिक जमा झाले. आमच्या भावना या ठिकाणी आहेत आम्हाला विश्वासात न घेता या ठिकाणी घुमटी कशी काय मोडून टाकली, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. त्यामुळे या ठिकाणी तणाव निर्माण झाला.
राष्ट्रीय महामार्ग पेडणे तालुक्यात महाखाजन ते पत्रादेवीपर्यंत पूर्ण झाला आहे. मात्र वळपे सीमेवर ‘बांधावरचा देव’ ही घुमटी गेली अनेक वर्षे आहे. अनेक वर्षे ती घुमटी तेथील जुन्या रस्त्याच्या बाजूलाच होती. मात्र, राष्ट्रीय महामार्गाचे काम हाती घेण्यात आले, त्या वेळी काम करताना या ठिकाणी कंत्राटदराने हे काम करताना अनेक अडचणी आल्यामुळे रस्त्याचा काही भाग तसाच सोडला होता. ती घुमटी त्यांनी तशीच ठेवली होती. तसेच त्या ठिकाणी बाजूला नवीन घुमटी बसवण्यासाठी आणून ठेवण्यात आली आहे.