रत्नागिरी : कोकण किनारपट्टीत मागील काही दिवसांपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे गोव्यातील पेडणे येथील रेल्वे टनेलमधून पाणी वाहू लागल्यामुळे, कोकण रेल्वेमार्ग धावणाऱ्या मुंबई मडगाव वंदे भारत एक्स्पेस, मांडवी, तेजस तसेच जनशताब्दीसह सुमारे १९ गाड्या रद्द करण्यात आल्या, तर लांब पल्ल्याच्या अनेक गाड्या पर्यायी मार्गाने वळवण्यात आल्या.
दरम्यान, रद्द झालेल्या गाड्यांसाठी प्रवाशांना त्यांच्या तिकिटाचा परतावा बुकिंग काऊंटरवर तत्काळ देण्याची व्यवस्था कोकण रेल्वेकडून करण्यात आली. रेल्वे सेवा पूर्वपदावर आणण्यासाठी कोकण रेल्वेकडून घटनास्थळी युद्धपातळीवर काम हाती घेण्यात आले आहे.
कोकण रेल्वेच्या कारवार रिजनमधील गोव्याच्या हद्दीत समाविष्ट असणाऱ्या मडुरे ते पेडणे दरम्यानच्या रेल्वेच्या भुयारी मार्गात मोठ्या बुडबुड्यांच्या स्वरूपात पाणी वाहू लागले. दि. ९ जुलै रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर, सुरुवातीला काही गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या. मंगळवारी रात्री १० वाजून १३ मिनिटांनी ट्रॅक फिटनेस सर्टिफिकेट मिळाल्यानंतर या मार्गावरील वाहतूक सुरूही करण्यात आली होती. त्या पाठोपाठ बुधवारीही दि. १० जुलै २०२४ रोजी पहाटे २.५९ वाजण्याच्या सुमारास पेडणे बोगद्यातून मोठ्या प्रमाणावर पाणी येऊ लागल्याने प्रवाशांच्या सुरक्षेसाठी खबरदारीचा उपाय म्हणून कोकण रेल्वेनकडून या मागनि धावणाऱ्या काही गाड्या रद्द केल्या आहेत.
कोकण रेल्वे मार्गावरील मडुरे येथे पेडणेदरम्यान असलेल्या टनेलमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी जमा झाल्याने कोकण रेल्वेची सेवा विस्कळीत झाली आहे. याच पार्श्वभूमीवर दि. १० जुलै रोजी मुंबईसाठी नेहमी मडगाव येथून सुटणारी मडगाव जंक्शन ते मुंबई सीएसएमटी (२०११२) ही कोकणकन्या एक्स्प्रेस सावंतवाडी रोड स्थानकातून मुंबईसाठी सायंकाळी ७ वाजून ३२ मिनिटांनी सुटली आहे. मडगाव ते सावंतवाडी रोड बुधवारची कोकणकन्या एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे. अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या असल्या तरी मुंबईकडे जाण्यासाठी तुतारी एक्स्प्रेस नेहमीप्रमाणे मुंबईसाठी सोडण्यात आली. त्यामुळे मुंबईकडे जाण्यासाठी खोळंबल्या प्रवशांना थोडासा दिलासा मिळाला.
कोकण रेल्वे मार्गावर मडुरे तसेच पेडणेदरम्यान असलेल्या रेल्वे बोगद्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी येऊ लागल्यामुळे रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वेचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संतोषकुमार झा हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्या देखरेखीखाली खंडित झालेली सेवा पूर्ववत करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू होते. रात्रीपर्यंत रेल्वे वाहतूक सुरू होईल, असे जनसंपर्क विभागाकडून सांगण्यात आले.
खंडित झालेली रेल्वे सेवा पूर्ववत करण्यासाठी कोकण रेल्वेने घटनास्थळी १०० मजूर, २५ पर्यवक्षक, चीफ इंजिनिअर स्तरावरील अधिकारी नॅशनल तसेच इंरनॅशनल कन्सल्टंट असा मोठा फौजफाटा घटनास्थळी तैनात केला होता. हे काम अविश्रांतपणे सायंकाळी उशिरापर्यंत सुरूच होते. रात्री ८ वाजतेर्यंत सेवा सुरू होईल, अशी माहिती 'कोरे'चे सीएमडी संतोषकुमार झा यांनी दिली.