कारवार : पुढारी वृत्तसेवा
नदीतील शिंपले गोळा करण्यासाठी गेलेल्या मच्छीमार कुटुंबातील सात महिलांसह दहा जणांचा बुडून मृत्यू झाला आहे, तर चौघांना वाचवण्यात आले. कारवार जिल्ह्यातील भटकळ तालुक्यात थट्टेहक्कल गावजवळ वेंकटपुरा नदीत रविवारी ही दुर्घटना घडली.
उमेश नायक (वय 30), लक्ष्मी महादेव नायक (42), लक्ष्मी नायक (30), लक्ष्मी अन्नप्पा नायक (60), लक्ष्मी शिवराम नायक (49), ज्योती नागप्पा नायक (34), मालती नायक (34), मास्तम्मा नायक (38) अशी मृतांची नावे आहेत. हे सर्वजण भटकळ येथील शिराली गावचे रहिवासी होते.
पोलिसांच्या माहितीनुसार, वेंकटपुरा नदी थोट्टेहोक्कल गावाजवळ समुद्राला मिळते. समुद्राला ओहोटी असताना नदीचे मुख उघडे पडते. त्यावेळी शिंपले सापडतात. ते जमा करण्यासाठी रविवारी सकाळी 11 च्या सुमारास नायक कुटुंबीय नदीत उतरले होते.
मात्र समुद्राला भरती आली आणि पाणी अचानक वाढले. नदीत दलदल होती. त्यामुळे वेळेत नायक कुटुंबीयांना बाहेर पडता आले नाही. यात 10 जणांचा बुडून मृत्यू झाला, अशी माहिती कारवार पोलिस अधीक्षक दीपन एम. एन. यांनी दिली.
पोट भरणारे शिंपलेच...
स्थानिक भाषेत कप्पेचिप्पा म्हणून ओळखले जाणारे शिंपले हा माशांचा प्रकार असून, ते खाल्ले जातात. ते काढण्यासाठी पाण्याची पातळी कमी असताना स्थानिक लोक बोटीने नदी आणि समुद्रात जातात.