डिचोली : पुढारी वृत्तसेवा
साखळी मतदारसंघातील सुर्ल ग्रामपंचायतीची ग्रामसभा रविवारी सरपंच सुचिता गावकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सायंकाळी उशिरापर्यंत चाललेल्या या ग्रामसभेत साळगावकर खनिज कंपनी आणि अल्कॉन कंपनीमुळे गावात निर्माण होणाऱ्या विविध समस्यांवर जोरदार चर्चा झाली.
जमिनी विनाकारण ताब्यात घेणे, बेकायदा कामे, कामगारांच्या समस्या तसेच गावातील इतर विविध विषयांवर ग्रामस्थांनी आपली मते मांडली.
यावेळी उपसरपंच सुभाष फोंडेकर, साहिमा गावडे, शाणू सुर्लकर, दिनेश मडकईकर, विश्रांती सुर्लकर, भोला खोडगीणकर यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सरपंच सुचिता गावकर यांनी सर्वांचे स्वागत केले, तर सचिव देसाई यांनी मागील ग्रामसभेचा अहवाल सादर केला.
गेल्या कित्येक वर्षांपासून सुर्ल गावात कार्यरत असलेल्या अल्कॉन कंपनीमुळे प्रदूषण आणि कामगारांच्या प्रश्नांसह अनेक समस्या निर्माण होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. या समस्यांबाबत ग्रामपंचायत मंडळाकडून ग्रामस्थांना अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याची नाराजीही व्यक्त करण्यात आली.
कंपनीत गेल्या अनेक वर्षांपासून काम करणाऱ्या कामगारांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घ्यावे, अशी मागणी ग्रामसभेत करण्यात आली. स्थानिक आमदार तथा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या प्रश्नाकडे लक्ष दिल्यास तो सहज सुटू शकतो, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला.
सुर्ल गावात गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत असलेल्या एका खाण कंपनीने मोठ्या प्रमाणावर जमीन खरेदी केल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला. गावातील सुमारे ६० टक्के जमीन भाटकरांकडून खरेदी केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. यात भातशेती, नारळबागायती, कुळागर, काजू बागायती तसेच अन्य जमिनींचा समावेश असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
या जमिनींच्या देखरेखीखाली असलेल्या काही संबंधितांना जमिनीच्या व्यवहारांची माहिती नसल्याचेही ग्रामसभेत निदर्शनास आणून देण्यात आले.
यावेळी महेंद्र शिरोडकर, उदय नाटेकर, प्रमोद नार्वेकर, श्री. आमोणकर, श्री. उसगावकर, आनंद फोंडेकर आदींनी विविध विषयांवर चर्चा केली.