सांगे : पुढारी वृत्तसेवा
नेत्रावळी पंचायत क्षेत्रातील सावरी येथे शेतीसाठी पाण्याची तीव्र समस्या भेडसावत असून पाण्याविना शेतीचे बरेच नुकसान होत असल्याची कैफियत सावरी येथील ग्रामस्थांनी मांडली आहे. या शेतीसाठी सावरी धबधब्यावरून नदीतून येणारे पाणी वन खात्याने पाईप घालून वळविल्याने ही समस्या उद्भवल्याचे लोकांचे म्हणणे आहे.
दरम्यान, स्थानिक पंचायत सदस्य राख्खी नाईक यांना ग्रामस्थांनी सावरी वाड्यावर बोलावून त्यांच्या ही गोष्ट कानी घातली आहे. आपण वनखात्याला रितसर निवेदन देऊन, सावरी येथील लोक पिढ्यानपिढ्या सावरी नदीचे पाणी शेतीसाठी वापरत असून ते वळविण्याचे प्रकार थांबवावे, अशी मागणी करणार.
लोकांनी बोलविल्याने आपण सावरी येथे आली, असे त्या म्हणाल्या. दरम्यान, ग्रामस्थांनी सांगितले की, त्यांना शेतीसाठी पाणी अपुरे पडत असल्याने काही महिला नदीतून थेट धबधब्याच्या दिशेने चालून गेली असता दोन तीन ठिकाणी लहान बांध घालून पाणी अडविल्याचे दिसून आले. आम्ही तेथे पाण्याला चाट मोकळी करून दिली त्यानंतर पुढे गेल्यावर वाहिनी घालून नदीचे पाणी वळविल्याचे दिसून आले.
हे पाणी वन खात्याने वळविल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. सावरी नदीच्या पाण्यावर पिढ्यानपिढ्या शेती करत आलो आहे, वन खात्याने हे पाणी सोडून द्यावे. त्यांनी पाण्यासाठी अन्य पर्याय शोधण्याची मागणी गावकऱ्यांनी केली. अर्धी अधिक शेती पडीक असून जी शेती केली आहे, त्या शेतीला धड पाणी मिळत नाही.
त्यामुळे बऱ्याच ठिकाणची शेती करपून गेली. गावाच्या वरच्या सावरी धबधबा असून त्याच्या वरच्या भागात श्री नासादेवाचे वास्तव्य असून हाच देव सावरी गावाचे रक्षण करतो, असा गावकऱ्यांचा ठाम विश्वास आहे; पण धबधब्याच्या ठिकाणी पर्यटकांकडून पावित्र्य राखले जात नसल्याने व धबधब्याच्या ठिकाणी स्नान करीत असल्यामुळे त्याचा दुष्परिणाम गावच्या लोकांवर होत आहे, असे गावकऱ्यांनी सांगितले.
...तर अन्य पर्याय सुचवावेत
गावातील लोक नोकरी करत नाहीत. शेती हाच आमचा मुख्य व्यवसाय आहे, असे सांगून वन खात्याने नदीचे पाणी जे जलवाहिनी घालून वळविले आहेत, ते त्वरित थांबवावे, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. तसेच स्थानिक पंचायत सदस्य राखी नाईक यांनी नैसर्गिकरित्या जे नदीतून पाणी वाहते ते तसेच चालू ठेवावे.
कारण, याच पाण्यावर सावरीतील शेतकरी गेली, अनेक दशके शेती करत आली आहेत. वन खात्याने टैंकर किंवा अन्य पाण्याचे पर्याय शोधावे, असे सुचविले. या भागात वास्तव्य करून असलेली कुटुंबे ही विशेषतः एसटी समाजाची असून त्याच्यावर अन्याय होणार नाही, याची दक्षता वन खात्याने घेण्याची गरज नाईक यांनी व्यक्त केली.