वाळपई : पावसाळ्यात उद्भवणाऱ्या विविध समस्यांचा सामना करण्यासाठी वाळपई विद्युत खात्याची यंत्रणा पूर्णपणे सज्ज झाली आहे. आवश्यक सर्व पूर्वतयारी करण्यात आली असून भूमिगत वीजवाहिन्यांचे काम मोठ्या प्रमाणात पूर्ण झाले आहे. उर्वरित काम पावसाळ्यानंतर हाती घेतले जाणार आहे. तसेच वीजवाहिन्यांवर धोका निर्माण करणाऱ्या झाडांची छाटणी ९० टक्के पूर्ण झाली असून पुढील आठ दिवसांत हे काम शंभर टक्के पूर्ण होईल, अशी माहिती वाळपई विद्युत खात्याचे सहायक अभियंता अरविंद गावडे यांनी दिली.
सत्तरी तालुक्यातील नागरिकांना पावसाळ्यात अखंडित व दर्जेदार वीजपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. मात्र, आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनीही सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
सत्तरी तालुक्यातील विविध भागांमध्ये वीजपुरवठा हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत यंदा अखंडित वीजपुरवठा देण्याचे प्रयत्न मोठ्या प्रमाणात यशस्वी ठरत आहेत. पूर्वी वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याच्या घटना घडत असत; मात्र भूमिगत वीजवाहिन्यांचे काम आणि वीज यंत्रणेची तातडीने दुरुस्ती केल्यामुळे या समस्येवर मोठ्या प्रमाणात नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे.
वीजपुरवठा हा नागरिकांच्या दैनंदिन जीवनासाठी अत्यावश्यक घटक असून पावसाळ्यात उद्भवणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी नागरिकांच्या सहकार्याची गरज आहे. त्यामुळे अखंडित वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन अरविंद गावडे यांनी केले आहे.
३३ केव्ही भूमिगत वीजवाहिनीचे ३० किलोमीटर काम पूर्ण
यासंदर्भात अधिक माहिती देताना अरविंद गावडे म्हणाले की, ३३ केव्ही क्षमतेच्या एकूण ६४ किलोमीटर वीजवाहिनीच्या भूमिगत जाळ्याला मंजुरी मिळाली आहे. त्यापैकी ३० किलोमीटरचे काम पूर्ण झाले असून उर्वरित काम पावसाळ्यानंतर हाती घेतले जाणार आहे. या प्रकल्पातील उर्वरित भागासाठी निविदा प्रक्रिया सुरू असून ती पूर्ण झाल्यानंतर कामाला गती मिळेल.
झाडांची छाटणी ९० टक्के पूर्ण
वीजवाहिन्यांवर झाडांच्या फांद्या पडून तारा तुटण्याच्या घटना टाळण्यासाठी छाटणीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. हे काम सुमारे २० टक्के पूर्ण झाले असून पुढील आठ दिवसांत शंभर टक्के पूर्ण होईल, अशी माहिती गावडे यांनी दिली. विद्युत खात्याचे कर्मचारी विविध भागांत वीजपुरवठा बंद करून सुरक्षित पद्धतीने छाटणीचे काम करत आहेत.
११ केव्ही नेटवर्कचे १७० किलोमीटर काम पूर्ण
११ केव्ही क्षमतेच्या एकूण २५२ किलोमीटर भूमिगत वीजवाहिनीपैकी १७० किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे. आणखी ६२ किलोमीटर भागात कव्हर कंडक्टर बसविण्याचे काम सुरू असून सुमारे ३० किलोमीटरचे काम पावसाळ्यानंतर पूर्ण केले जाणार आहे. ज्या ठिकाणी वीजवाहिन्या टाकण्यासाठी खड्डे खोदण्यात आले आहेत, त्या ठिकाणी पावसाळ्यात कोणतीही अडचण निर्माण होऊ नये, यासाठी विशेष खबरदारी घेण्यात आली आहे