पणजी : पुढारी वृत्तसेवा
मुसळधार पावसामुळे राज्यातील धरणातील पाण्याच्या पातळीत समाधानकारक वाढ झाली आहे. साळावली, गवाणे धरणांत ९२ टक्के, तर तिळारीत ८२ टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. अंजुणे धरणाची पाणीपातळी सर्वात कमी म्हणजे ५१ टक्के आहे.
राज्यात सध्या सुरू असलेला पावसाचा जोर आणखी आठवडाभर कायम राहिल्यास दक्षिण गोव्यातील साळावली धरण पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदा राज्यात पिण्याच्या पाणीटंचाई निर्माण होणार नाही, असा विश्वास सार्वजनिक बांधकाम व पाणीपुरवठा मंत्री सुभाष फळदेसाई यांनी व्यक्त केला.
जलस्रोत आणि पाणीपुरवठा विभागाकडून राज्यातील सर्व धरणांच्या पाणीसाठ्याचा नियमित आढावा घेतला जात आहे. पावसाचा जोर वाढल्याने साळावलीसह इतर जलस्रोतांमधील पाणीपातळीत वाढ झाली असून, भविष्यातील पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्यात येत आहे. आपत्कालीन परिस्थितीत खाणीतील पाण्यावर प्रक्रिया करून वापरण्याची चाचपणी करण्यात येईल, असेही फळदेसाई म्हणाले.
साळावली ९२.६
अंजुणे ५१.०
आमठाणे ७७.२
पंचवडी ७८.३
चापोली ६०.९
गवाणे ९२.४
तिळारी ८२.०